सातारा – शनिवार पेठेतील गोरक्षण बोळ परिसरातील श्रीमंत छत्रपती राजमाता क्रीडा संकुलामध्ये चक्क जेवणावळी आणि तळीरामांच्या ओल्या पार्ट्या होऊ लागल्याने या क्रीडा संकुलाचा क्रीडा विकासनाचा मूळ हेतू धोक्यात आला आहे. क्रीडा संकुलात चालणाऱ्या या गैरप्रकारांना नगरपालिकेने आळा घालावा, अशी मागणी होत असताना राजकीय दबावातून प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे.
शनिवार पेठेतील सर्वे क्रमांक 650, 651, 672,673 व 676 येथील गोरक्षण बोळ परिसरात श्रीमंत छत्रपती राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. माजी नगराध्यक्ष स्मिता घोडके यांच्या पुढाकाराने विकास करातून दीड कोटी रुपये खर्च करून हे क्रीडा संकुल उभे करण्यात आले आहे. सातारा शहरातील गुणवान खेळाडू यांना सरावासाठी जागा उपलब्ध व्हावी तसेच त्यांना संकुलात अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूसाठी हे संकुल उभे करण्यात आले आहे. त्याकरिता पालिकेने 73 लाख 85 हजार रुपये खर्च केला असून 21 डिसेंबर 2019 च्या सर्वसाधारण सभेने या महत्त्वाकांक्षी विषयाला मंजुरी दिली होती. येथे ओपन जीम, प्लॅटफॉर्म तसेच वॉकिंग ट्रॅक आणि लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली आहेत. शनिवार पेठेतील बंदिस्त जागेमध्ये प्रशस्त जागा असलेले हे एकमेव क्रीडा संकुल आहे
मात्र, क्रीडा विकासनाचा मूळ हेतू येथील अतिक्रमणांमुळे मागे पडू लागण्याची भीती निर्माण झाली आहे. या क्रीडा संकुलात रात्री उशिरा तळीरामांच्या ओल्या पार्ट्या झडू लागल्या असून सातारा पालिकेच्या स्थावर जिंदगी विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कोणीही यावे आणि रात्री आठच्यानंतर फर्मास पार्टी झोडावी अशा वाढत्या प्रकारामुळे रात्री उशिरा शतपावलीसाठी येणाऱ्या सातारकर महिलांची सुद्धा या संकुलात जाण्याची अडचण झाली आहे. तसेच या क्रीडा संकुलामध्ये चक्क जेवणावळींचे बेत सुद्धा रंगू लागले असून या जेवणावळींच्या खरकट्या पत्रावळ्या आणि इतर घाण ही लगतच्या ओढ्यामध्ये टाकून दिली जात आहे. त्यामुळे शनिवार पेठेतला सर्वात मोठा ओढा तुंबण्याची भीती निर्माण झाली असून या ओढ्याची स्वच्छता सुद्धा केली जात नाही.
क्रीडांगणाच्या पूर्व बाजूला कबुतराच्या ढाबळीचे अतिक्रमण झाले असून येथे पन्नास कबुतरे रोजची उडवली जातात. हे अतिक्रमण कोणाच्या सांगण्यावरून झाले आहे हे आजपर्यंत समजलेले नाही. येथील परिसरातील नागरिकांनी व क्रीडाप्रेमींनी हे अतिक्रमण हटवावे, अशी वारंवार मागणी प्रशासक व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे केली होती. मात्र या ढाबळीला राजकीय वरदहस्त असल्याने प्रशासन राजकीय दबावातून हतबल असल्याची चर्चा गुपचूप पणे ऐकायला मिळते. क्रीडा संकुलाच्या विकसन आणि वापरावरून सध्या राजकीय वादावादी सुरू आहे.