मुंबई – केंद्र सरकारने जारी केलेल्या पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. बॅंकांनीही कर्जपुरवठा वाढावा यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून कर्जपुरवठा वाढविण्याची मोहीम हाती घ्यावी अशी सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
कर्ज वितरण, कर्ज वसुली आणि इतर विषयावर सीतारामन यांनी देशातील बॅंक प्रमुखांशी चर्चा केली. या अगोदर 2019 मध्ये बॅंकांनी 400 जिल्ह्यामध्ये कर्ज मेळावे आयोजित केले होते. अजूनही कर्ज पुरवठ्यातील वाढ केवळ सहा टक्के आहे. कर्जपुरवठा वाढण्याची गरज आहे. ऑक्टोबर 2019 ते मार्च 2021 या कालावधीत बॅंकांनी 4.94 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून बॅंका आणखी कर्जपुरवठा वाढविण्यासाठी मोहीम हाती घेणार आहेत. देशातील इतर सर्व भागांमध्ये कर्जपुरवठ्याची परिस्थिती चांगली असली तरी पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंड अशा पूर्व भारतातील भागात कर्जपुरवठा वाढत नाही. याकडे बॅंकांनी लक्ष द्यावे, असे त्या म्हणाल्या.
एक जिल्हा एक उत्पादन
भारतातील सर्व जिल्ह्यातून निर्यात वाढण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यांनी एक जिल्हा एक उत्पादन अशी यंत्रणा विकसित करण्याची गरज आहे. राज्यांनी निर्यातदारांनी चर्चा करून अशी उत्पादने ठरवावीत. त्यामुळे निर्यात वाढण्यास मदत होईल. केवळ देशांतर्गत बाजारपेठेवर अवलंबून राहून चालणार नाही, असे सीतारामन म्हणाल्या.