कोपरगाव -महाविकास आघाडी सरकारने समाजातील गरीब कुटुंबांना दोनवेळचे अन्न मिळावे, यासाठी शिवभोजन थाळी योजना सुरू केली आहे. करोनाच्या संकटात लॉकडाऊन असताना या शिवभोजन थाळीचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत तहसील कार्यालय आ. काळे यांच्या हस्ते शिवोभाजन थाळी योजनेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. कृष्णा फुलसुंदर, शिवभोजन थाळी केंद्र चालक अष्टविनायक बचतगट, प्रतिमा बचतगटांच्या सदस्या व नागरिक उपस्थित होते.
आ. काळे म्हणाले, करोनाच्या संकटावर प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे आज कोपरगाव तालुका करोनामुक्त आहे.
हीच परिस्थिती पुढेही अशीच राहावी, यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. शिवभोजन थाळी सुरू झाल्यामुळे गरजू नागरिकांची मोठी सोय झाली आहे. गरजूंसाठी आजपासून सकाळी 11 ते 3 या वेळेत तहसील कार्यालय व बागूलवस्ती (कोपरगाव जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या शेजारी) या दोन ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. गरजूंनी सोशल डिस्टन्सिंग पाळून शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा व प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.