दुबई – भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या खांद्याला झालेली दुखापत बरी झाल्याचे सांगितले जात असले तरीही तो पुढील सामने खेळू शकेल की नाही याबाबत संघ व्यवस्थापन लवकरच निर्णय घेणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध येत्या रविवारी होत असलेल्या सामन्यासाठी त्याचा विचार करायचा की नाही, याबाबात अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता.
या सामन्यात पंड्याने 8 चेंडूंत 11 धावा केल्या. याच डावात त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्याने तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरला नाही. त्यामुळे हार्दिकच्या संघातील स्थानाबाबत चर्चा रंगत आहेत.
पंड्याच्या खांद्याची चाचणी करण्यात आली असून त्याची दुखापत फारशी गंभीर नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी अद्याप पाच दिवस शिल्लक असल्याने त्याला पुरेशी विश्रांतीसुद्धा मिळत आहे. मात्र सरावादरम्यान त्याची तंदुरुस्ती पाहूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआयने सांगितले आहे.