सातारा – ज्या भागात 2011 पासून 2017 पर्यंत दुष्काळ होता, त्या भागात आता ढगफुटी व्हायला लागली असून अतिवृष्टीने नुकसान होत आहे. नुकसानभरपाईबाबत विधिमंडळात चर्चा होते. नुकसानभरपाई थोडीफार देऊ शकतो; परंतु पर्यावरण बदलाचे घातक परिणाम होत असून स्वतःसाठी पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे. इशासनाकडून शाश्वत विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले.
सातारा जिल्हा बॅंक आणि इंटरनॅशनल क्लब ऑफ लायन्स क्लब यांच्यावतीने व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून “ग्लोबल वॉर्मिंग- ग्लोबल वॉर्निंग’ या परिसंवादात ते बोलत होते.
पुढील आयुष्य पर्यावरण संवर्धनासाठी : ना. रामराजे
तीन अपत्ये असलेल्यांना, शौचालय नसलेल्यांना निवडणूक लढवता येत नाही. याच धर्तीवर झाडे लावली, तरच निवडणूक लढवायची, असा नियम झाला पाहिजे. यासाठी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. शासन काम करत आहे. त्यात त्रुटी राहू शकतात. सातारा जिल्ह्यात पर्यावरणाचे काम करणाऱ्यांसाठी राजकीय पक्षांशी निगडीत नसलेले 11 तालुक्यांतील शंभर तरुण हवे आहेत. ते तापमान वाढीवर काम करतील. राजकारणाबरोबर पुढील आयुष्य पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित करण्याची घोषणा ना. रामराजे यांनी केली.