नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे पंजाबमधील जालंधर येथील खासदार सुशीलकुमार रिंकू यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आम आदमी पक्ष भडकला असून आपचे प्रवक्ते मालविंदर सिंग कांग यांनी तर रिंकू यांना गद्दार म्हटले आहे.
सुशीलकुमार रिंकू नावाची ही व्यक्ती पंजाबमध्ये आमदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाली होती. आम आदमी पक्षाने त्यांना उचलले, पुढे केले. जालंधर येथून खासदार केले. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान या दोघांनी त्यांचा प्रचार केला आणि त्यांना मताधिक्क्य मिळवून देण्यात मदत केली. मात्र त्यांनी काय केले? ते गद्दार आहेत. असे कांग म्हणाले.
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रिंकू यांनीही माध्यमांशी संवाद साधला होता. ते म्हणाले की देश पुढे जातो आहे, मात्र पंजाबमध्ये काही तरी गल्लत होते आहे. पंजाबमधील माझ्या मतदारसंघात मी पाहिले की विकासाच्या विषयात आम्ही किती मागे आहोत.
एक खासदार म्हणून मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे काम पाहायला मिळाले तेंव्हा मी खूप प्रभावित झालो. नवीन जालंधर घडवण्याचे विशिष्ट ध्येय घेऊन मी भाजपमध्ये दाखल झालो आहे. मला कशाची भिती नाही. जे लोक कोणत्या घोटाळ्यात सहभागी आहेत आणि तपास संस्थांच्या रडारवर आहेत त्यांनी घाबरले पाहिजे.