अरूणा सरनाईक
सोशल मीडिया हा आजच्या जमान्याचा जणू श्वास. तंत्रज्ञानाच्या या आधुनिक आविष्कारानं सर्वांनाच आपल्या कवेत घेतलं. किती तरी गोष्टी सोप्या झाल्या. जग जवळ आलं. पण सुधारणा, प्रगती मग ती तंत्रज्ञाची असली तरी ती आपल्यासाठीच आहेत. पण त्याचा योग्य वापर करण्याची जबाबदारी आपली आहे. मुलांचं भावविश्व, निरागसपणा जपणं योग्य वेळी योग्य ज्ञान देणं, माहिती देणं, पालकांचे कर्तव्य आहे याची जाणीव ठेवावी. मग संपूर्ण आकाश आपलेच आहे!
सोशल मीडिया ही आजच्या प्रगत तंत्रज्ञानाची एक अनमोल भेट आहे. आज सोशल मीडियाशी जोडून असणं ही अत्यावश्यक गरज बनली आहे. या नवं समाजमाध्यमाने जगाला एकत्र बांधून ठेवले आहे. केवळ पृथ्वीवरच नाही तर अंतरीक्षदेखील आपल्याशी जोडले आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असा तुम्ही आपल्या कुटुबांशी मित्रांशी जोडलेले राहता. आज श्वासाइतके हे साधन प्रभावी ठरून काळाची गरज बनते आहेत. अगदी लहान मुलं आणि वयस्कर असे सर्वजण याच्याशी मित्रत्वाने जोडलेले आहेत. आधुनिक काळाची ही गरज ठरलेली आहे.
पूर्वी सोशल मीडिया हा शब्ददेखील परिचयाचा नव्हता. आपापसात परस्परसंबंध जरी चांगले होते, तरी वेळेला बोलवायचे असले तर बरीच यातायात करावी लागे. त्याकाळात टेलिग्राम, तार ही पोस्टाखालची माध्यमं सक्रिय होती. विलंबाने का होईना एकमेकांची खुशाली कळत होती. रेडिओ हासुद्धा एक सोशल मीडियाचा प्रकार लोकप्रिय होता. वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके याद्वारे माहिती, विचारांची देवाणघेवाण होत होती. सकाळच्या रेडिओवरील बातम्यांसाठी वाट पाहिली जायची. पण आज जगात कुठेही व काही घडले तर क्षणात सर्वत्र कळते. आजच्या शब्दात बोलायचे झाले तर व्हायरल होते. या सोशल मीडियाचे विविध प्रकार आहेत. जसे रेडिओ, टीव्ही, मेसेजर, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉटस्ऍप, यूट्युब इत्यादी. या सर्वांचा जनक आहे इंटरनेट. जेव्हा कॉम्प्युटरचा वापर सर्वत्र सुरू झाला. लॅपटॉप आले, मोबाइल आले.
जगाच्या प्रगतीचा आलेख उंचावू लागला. साधारणपणे 2012 पासून इंटरनेट ही कल्पना अस्तित्वात आली. इंटरनेट म्हणजे आतून एकमेकांशी जोडून असणे. हाच जोडलेपणा सोशल मीडियाने ओळखला आणि आपला विस्तार सुरू केला. प्रगती सुरू झाली. पण त्याचबरोबर फायदे आणि गैरफायदे पण आले. व्यक्तिगत असं काहीच राहिलं नाही. जरा काही आपल्या आयुष्यात वेगळं घडलं की, लागलीच ते सोशल मीडियाच खाद्य बनतं! विशेषत: जी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वं आहेत, जे बॉलीवूड कलाकार आहेत, जे राजकारणी आहेत किंवा कोणत्याही क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत. त्यांच्या आयुष्यात काय घडलं, कोणत्या प्रसंगी ते कसे वागले. कोणाचे कोणाबरोबर अफेअर आहे या सर्व गोष्टींचे चर्वितचर्वण मोठ्या उत्साहाने केल्या जाते. यामध्ये बरेचदा अतिरेकाचे अंतिम टोक गाठले जाते. त्याचा परिणाम अतिशय विपरीत होतो. यामुळे काही आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहेत. फेसबुक, व्हॉटस्ऍप, ट्विटर, इन्टाग्रामवरील सर्व चर्चा या फारशा ज्ञानवर्धक नसतात. अर्थात त्यालाही अपवाद आहेत.
फेसबुक हा सोशल मीडियाचा एक महत्त्चाचा घटक आहेत. आज तरुणाईपेक्षा वयस्कर लोक, लहान मुलं याचे वाचक आहेत. काहीही झालं तरी ते काही सेकंदांच्या आत फेसबुकवर अपलोड होतं! कोणाचा जन्म, लग्न, अगदी खासगी घटनासुद्धा फेसबुकवर टाकल्या जातात. अर्थात काही वेळेला हे माध्यम बरेच उपयोगी पडते. तर काही वेळेला फसगतीचे साधन ठरते. “अगं कोणाशी लग्न ठरलंय? या प्रश्नाला “फेसबुक फ्रेंड’ असं हे उत्तर मिळतं! फारशी काही माहिती नसताना केवळ थोडक्या आणि
त्याही फारशा खऱ्या नसणाऱ्या माहितीवरील विवाह अल्पकाळाचे ठरतात. वयस्क मंडळीची तर खूप जास्त फसगत होताना दिसणे. आला दिन पेपरमध्ये अशा बातम्या वाचायला मिळतात. आधुनिक तंत्रज्ञानाने माणसं जोडली गेली. पण कोणत्याही गोष्टींचा अतिवापर वाईटच असतो. आज इंटरनेट, इन्स्टाग्राम, ट्विटर ही सोशल मीडियाची प्रभावी साधने आहेत. अनेक असे डिसिजन मध्यरात्री घेतले जातात. देशाला केले जाणारे आवाहन असो, कधी महत्त्वाचे निर्णय असो अशा वेळेस जनतेपर्यंत संदेश पोचविण्याचे तत्पर साधन म्हणून सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. या माध्यमानं जग जवळ आले. माणसं जवळ आली.
मात्र, आज काही वेळेला त्याचे दुष्परिणाम फार पाहायला मिळतात. एवढ्यातच गाजलेलं लग्न म्हणजे कॅटरिनाचे. किती महत्त्व तिच्या कपड्यांना, कोणी काय गिफ्ट दिली याची माहिती देण्यापर्यंत. गृहप्रवेश सर्वात कळस म्हणजे तिच्या त्या रात्रीची सजावट… त्याचे फोटो… किती विचित्र प्रकार आहे. प्रत्येकाचे खासगी आयुष्य असते ना! मग त्याविषयीच्या चर्चा, न मागितलेली मतमतांतरे! कशासाठी हा उपद्व्याप? काही वेळेला मग त्याचे अनुकरण करण्याची इच्छा आणि त्या इच्छा पूर्ण करण्यामागे मोजावी लागणारी वाटेल ती किंमत!
यूट्युब एक असाच प्रभावी प्रकार आहे. यामधील ज्ञान अगाध आहे. पण याचे प्रमुख विषय म्हणजे बच्चन कुटुंब, अंबानी कुटुंब, रेखा, अमिताभ काळाच्या किती मागं घडलेल्या घटनांवर काहीतरी व्हिडिओ बनवायचे आणि ते टाकायचे.
सतत ते पाहायचा देखील कंटाळा येतो. काही चांगल्या गोष्टीही आहेत. काही महत्त्वपूर्ण माहितीदेखील असते. पण अशासाठी वापर करणारा एक वेगळा वर्ग आहे. सर्वसामान्य लोक मात्र या गॉसिपमध्ये अडकतात. ट्विटरवर काही तरी विचित्र पोस्ट करायच्या… लोकांनी आक्षेप घेतलं की जाहीर माफी मागायची असे प्रकार कायमच होत असतात. मध्यंतरी ब्ल्यूव्हेल आणि पब्जी या गेम्सचा बोलबाला होता. किती कोवळे बालपण खराब झाले. लहान वयात नको त्या गोष्टी पाहिल्या गेल्या. त्यामुळे बालगुन्हेगारांचे प्रमाण वाढीला लागलेले होते.
थोडक्यात असं म्हणूया की, सुधारणा, प्रगती मग ती तंत्रज्ञाची असली तरी ती आपल्यासाठीच आहेत. पण त्याचा योग्य वापर करण्याची जबाबदारी आपली आहे. मुलांचं भावविश्व, निरागसपणा जपणं योग्य वेळी योग्य ज्ञान देणं, माहिती देणं, पालकांचे कर्तव्य आहे याची जाणीव ठेवावी. मग संपूर्ण आकाश आपलेच आहे!