– योगेश मिश्र
शहाजहानने त्याची पत्नी मुमताज हिच्यासाठी ताजमहाल बांधला.हा ताजमहाल प्रेमाचे प्रतीक म्हणून जगभरात ओळखला जातो. पत्नीप्रेमाचे हल्लीही अनेक प्रतीक सांगता येतील.
केवळ शहाजहान हा पत्नीवर प्रेम करणारा एकटाच पती नव्हता, असे सांगणारी अनेक सत्ये आणि तथ्ये आहेत. शहाजहान आणि मुमताज यांच्या प्रेमकहाणीने बुऱ्हाणपूरमध्येच उत्कर्षबिंदू गाठला होता. आता बुऱ्हाणपूर चर्चेत येण्याचे कारण असे की, या शहरातील एका मद्य व्यापाऱ्याने त्याच्या पत्नीला ताजमहालासारखे सात बेडरूम असलेले घर भेट म्हणून दिले आहे.
घरात सात बेडरूम असण्याचे कारण असे की आठवड्यातील सात दिवस वेगवेगळ्या प्रकारे आनंदात व्यतीत करता यावेत. या प्रेमाच्या गोष्टी आहेत आणि अजरामर प्रेमाचे उदाहरण शहाजहान आणि मुमताज यांच्या कहाणीद्वारे दिले जाते. वास्तविक, अकबराने जेव्हा बुऱ्हाणपूर 1601 मध्ये खानदेश संस्थानातून जिंकून मुघल साम्राज्यात समाविष्ट केले,
तेव्हापासून हे शहर मुघल साम्राज्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण बनले. शहाजहानने या शहरात अनेक वर्षे व्यतीत केली. येथे शाही किल्ला बांधला. याच किल्ल्यात मुमताज बेगमसाठी बांधलेला खास हमामखाना होता. या हमामखान्याच्या भिंतींवर जी चित्रे काढली आहेत, त्यातील एक हुबेहूब ताजमहालासारखे आहे.
प्राणाहून प्रिय असलेल्या आपल्या पत्नीसाठी शहाजहानने ताजमहाल जरी आग्रा येथे बांधला असला तरी मुमताज बेगमचे खरे नाते बुऱ्हाणपूरशी होते. आग्रा शहराशी मुमताजचे नाते केवळ मीना बाजारपुरतेच मर्यादित होते. अर्थात, मुमताज बेगमने आपला सर्वाधिक काळ बुऱ्हाणपुरातच व्यतीत केला. आपल्या चौदाव्या मुलाच्या जन्मावेळी याच शहरात तिचा मृत्यू झाला होता. बुऱ्हाणपुरातील असीरगढमध्ये मुमताजचा दफनविधी करण्यात आला.
जेव्हा ताजमहाल बांधून तयार झाला, त्यानंतर सहा महिन्यांनी मुमताजला आग्रा येथे नेऊन पुन्हा दफन करण्यात आले. बुऱ्हाणपूरमध्ये मुमताजची आठवण म्हणून शहाजहानने एक काळा ताजमहालसुद्धा बांधला होता. मुमताज शहाजहानला भेटण्यापूर्वीच तिचे लग्न झालेले होते. तिचा पती शेर अफगाण खान हा शहाजहानच्या सुभेदारांपैकी एक होता. शहाजहानची आणखी एक प्रिय बेगम मोती हिचा मकबराही बुऱ्हाणपूर येथेच आहे. मोती महाल नावाने तो ओळखला जातो.
महाकाव्यांमधील वर्णनांनुसार, बुऱ्हाणपूरचा असीरगड दुर्ग हा एक प्राचीन दुर्ग आहे. या किल्ल्यात एक शिवमंदिर आहे. चिरंजीवत्व लाभलेला अश्वत्थामा या मंदिरात दररोज येतो आणि शिवलिंगाला पुष्पांजली अर्पण करतो, असे सांगितले जाते. हे मंदिर खूपच लहान आहे. मंदिराजवळ अश्वत्थामा नावाचा जलकुंडही आहे. बुऱ्हाणपूरमध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी पाणीपुरवठा यंत्रणा आहे.
ही प्राचीन यंत्रणा मुघलांनी उभारली होती. ही अनोखी पाणीपुरवठा यंत्रणा निर्माण करणाऱ्या व्यक्तीचे नाव अब्दुल रहीम खानखाना होय. त्यांनी ही अत्यंत सुविहित योजना तयार केली. या यंत्रणेत जलाशय, कुंड, पाट आणि जलवाहिन्यांचाही समावेश होता. ही योजना आजही अस्तित्वात आहे.
“अराउंड दि वर्ल्ड इन 80 डेज्’ हे फ्रेंच लेखक जूल्स वर्नी यांचे गाजलेले पुस्तक आहे. या कादंबरीत एका व्यक्तीच्या जगप्रवासाचे वर्णन आहे. हा जगप्रवास या व्यक्तीने 80 दिवसांत पूर्ण केला होता. प्रवासात ही व्यक्ती बुऱ्हाणपूरलाही आली होती. कापूस, कापड आणि दोरी तयार करण्याच्या उद्योगासाठी बुऱ्हाणपूर प्रसिद्ध आहे. येथे एकाहून एक सरस दोऱ्या तयार केल्या जात असत आणि त्यांचा पुरवठा जगभरात केला जात असे.
आजही हे शहर या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. जिलेबी ही तसे पाहायला गेल्यास एक सर्वसामान्य मिठाई आहे. परंतु बुऱ्हाणपूरची जिलेबी काही औरच असते. येथील खाण्यापिण्याच्या सवयींवर मुघल परंपरेची छाप दिसून येते. कदाचित त्यामुळेच खाणेपिणेही वेगळ्याच प्रकारचे आहे. या शहरात मिळणाऱ्या जिलेबीत मावा म्हणजे खवा भरलेला असतो. त्यालाच “खोये की जलेबी’ म्हणतात. याखेरीज बुऱ्हाणपूरची रुमाली रोटीही खूपच लोकप्रिय आहे.
रोटी भाजण्याची अनोखी कला मुघल काळापासून चालत आली आहे. भृगुसंहितेत या शहराचा उल्लेख केला आहे, असे सांगितले जाते. कारण या शहराची रचना भृगुऋषींनी तापी नदीच्या किनारी बसून केली होती. असे म्हणतात की, प्राचीन काळात या शहराला ब्रह्मपुरी म्हणून ओळखले जात असे. परंतु त्याचे कोणतेही पुरावे अस्तित्वात नाहीत.
अशा प्रकारे अनेक बाबतीत प्रसिद्ध असलेल्या या शहराकडे एका मद्य व्यावसायिकाने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे, असे म्हणता येईल. परंतु केवळ शहाजहान आणि हा व्यापारीच असे नाहीत, ज्यांनी आपापल्या पत्नीला अनमोल वास्तू भेट म्हणून दिली. यांच्या व्यतिरिक्तही अनेक लोक असे आहेत, ज्यांनी आपल्या पत्नीवरील प्रेम आपल्या कृतींनी अमर करून ठेवले आहे.
मध्य प्रदेशातील कटनी येथे राहणाऱ्या कल्पनाथ यांची पत्नी दरवर्षी छठपूजा करण्यासाठी बिहारमध्ये जात असे. या काळातील पत्नीवियोग पतीला सहन होत नसे. त्यामुळे कल्पनाथ यांनी पत्नीला दूर जाण्यापासून रोखण्यासाठी कटनीमध्येच सिमरार नदीवर घाट बांधून घेतला. हा घाट पती-पत्नीच्या प्रेमासाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.
याच धर्तीवर चंडीगड येथील उद्योजक हरीश गोयल यांनी त्यांच्या पत्नीला व्हॅलेन्टाइन वीकच्या प्रारंभी कारचा व्हीआयपी नंबर भेट दिला होता. या नंबरसाठी त्यांना केवळ पावणेनऊ लाख रुपये मोजावे लागले. वास्तविक, पत्नी कामिनी यांनी पतिराजांना काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वाढदिवसाला दीड कोटी रुपयांची पोर्शे कार भेट दिली होती. त्या मोबदल्यात पतिराजांनी केवळ कार नंबरसाठी पावणेनऊ लाख खर्च केले. अजमेरमध्ये राहणारे धर्मेंद्र अनिजा हे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चंद्र-तारे तोडून आणू शकले नाहीत;
मात्र पत्नीला खूश करण्यासाठी त्यांनी चंद्रावर तीन एकर जमीन खरेदी केली आणि पत्नीला भेट म्हणून दिली. धर्मेंद्र अनिजा यांनी लूना सोसायटी इंटरनॅशनलच्या माध्यमातून ही जमीन खरेदी केली आहे. धर्मेंद्र सांगतात, की या पूर्ण प्रक्रियेसाठी जवळजवळ एक वर्ष लागले. ज्यांच्याकडे काही नाही, त्यांच्यासाठी मात्र दोन हात पुरेसे आहेत. हे सिद्ध करून दाखवले, मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील एका मजुराने. भरतसिंह नावाच्या या मजुराने त्याची पत्नी सुशीला हिच्यासाठी आपल्या हाताने विहीर खणून दिली.
वस्तुतः सुशीला हिला पाणी आणण्यासाठी खूप दूरवर जावे लागत असे. पत्नीला होणाऱ्या यातना पाहून या गरीब मजुराने तिला भेटवस्तू देण्यासाठी अनोखी युक्ती शोधून काढली. आपल्या झोपडीजवळच त्याने एक विहीर खणली. दुरून पाणी आणण्याचे आपल्या पत्नीचे कष्ट त्याने अशा प्रकारे वाचविले.
त्याचप्रमाणे गुजरातमधील अहमदाबादमध्ये राहणारे विनोद पटेल यांनी प्राणाहून प्रिय पत्नी रीताचा जीव वाचविण्यासाठी आपली किडनी दान केली. विनोद यांनी आपल्या लग्नाच्या 23 व्या वाढदिवसानिमित्त पत्नीला किडनीचे दान दिले. रीता यांच्या दोन्ही किडन्या खराब आहेत. गेल्या तीन वर्षांपासून उपचार सुरू आहेत. प्रेमात लोक काहीही करू शकतात… खिसा भरलेला असला तरी आणि… रिकामा असला तरी!