मुंबई – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या एफआरपीच्या धर्तीवर राज्यातील कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्यास शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.
मंत्रालयात आज दूध उत्पादक शेतकरी आणि संघटना यांच्या दूध दरवाढ आणि इतर समस्यांबाबत आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार ऍड. अनिल बोंडे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंग देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
केदार म्हणाले, दूध उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी लागू करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी प्रतिनिधी, शासकीय आणि खासगी दूधसंघ यांच्या सूचना ऐकून घेतल्या आहेत. याविषयीच्या लगेचच सर्व बाजूंचा अभ्यास करण्यात येणार असून याबाबत निर्णय घेऊन अमंलबजावणीची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगितले.
राज्यात गेल्या दोन वर्षापासून लॉकडाऊनमुळे दूध दराचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. याकालावधीत शासनाने ग्रामीण भागातील कष्टकरी दूध उत्पादक शेतकरी यांना मदत करण्यासाठी जास्तीचे दूध खरेदी केले आणि त्याची पावडर तयार केली. 10 लाख लिटर दूध खरेदी करण्याचे शासनाने उद्दिष्ट ठेवले होते. राज्यातील शेतकऱ्यांची या निर्णयामुळे लॉकडाऊनची तिव्रता कमी करण्यात शासनाला यश आले.
शेतकऱ्यांनी डेअरीला दूध दिल्याबरोबर पावती देण्याच्या आणि पावतीवरील मजकूर अंतिम करण्याच्या सूचना देण्यात येतील. पशुधनाच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील. अधिकारी -कर्मचारी रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अधिक गतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितले.