अवंती सरदेसाई
चैत्र-वैशाखातील निसर्गातील बहर थक्क करणारा असतो. गुलमोहर, बाहवा, निशिगंध, मधुमालती यांचं या दिवसातलं सौंदर्य म्हणजे निसर्गाचा सोहळाच असतो. आपल्या आयुष्याला अधिक सुंदर, अर्थपूर्ण करणारी ही निसर्गचिन्हे आणि त्यांच्यातले अर्थ आपण दृष्टीक्षेप टाकला तरी समजून घेता येणारी आहेत.
उन्हाचा ताप प्रखर होत जातोय. एरवी तेजाचा अभिषेक करणारा तो सूर्यनारायण आता सकाळी सात-साडेसातपासूनच प्रखर किरणांचे झोत घेऊन तळपतो आहे. दिवस मोठा झालाय आणि कधी एकदा आपण चंद्रप्रकाशाच्या सहवासात जातोय, असे होऊन गेले आहे. पण मित्रांनो, दिवसाचा असह्य तापही क्षणभर विसरावा असेही काही आसपास घडते आहे, याची जाणीव आपल्याला आहे का? वैशाखात येणारी बुद्धजयंतीची पौर्णिमा आता जवळ आली आहे. खरेतर प्रत्येक पौर्णिमेचे सौंदर्य निराळेच असते. पण प्रदीर्घ आणि प्रचंड तेजाचा वर्षाव करणाऱ्या दिवसानंतर भेटणारी बुद्धपौर्णिमा आपल्या शीतल चांदण्यासोबत रातराणीचा सुगंधही घेऊन येते. मोगऱ्याचे धुंद गंधकोश उमललेले असतात. जोडीला सायली, मदनबाण, जाई, जुई… ही सारी सुगंधी आणि नाजुक मंडळी असतातच. सायंप्रकाश रेंगाळण्याचा काळही मोठा असतो. शिरीषाचा वृक्षही फुललेला असतो.
भर उन्हातही अमाप फुललेला केशरी गुलमोहर, पिवळ्या रंगाच्या अनेकानेक छटा मिरवणारा बाहवा, धरणीमातेला अभिवादन करताहेत, असे वाटायला लावणारे या वृक्षाचे लोंबणारे ते असंख्य घोस मन प्रसन्न करतात. बांधाबांधावर, रस्त्याच्या कडेने आणि कुठेही तग धरणारी बाभळीची खरे तर माळरानावरची सखी. पण उजाडपणा निर्माण करण्यात आपण पुढे असल्याने ही झाडे आता शहरातही दिसू लागली आहेत. गुलाबाला काटे असले तरी तो आपल्याला प्रिय वाटतो, पण काटे असूनही मुक्तपणे बहरलेले बाभळीचे झाड भर उन्हात फार प्रेक्षणीय दिसते. शिवाय गावागावातील माळरानावर फुललेल्या देवबाभळींची फुले तर दूरवरून त्यांच्या सुगंधातूनच ओळखीची होतात.
निशिगंध आपले नाव सार्थ करत साऱ्या रात्री सुगंधाने भारून टाकत असतो.
मत्त चाफाही आपले सारे वैभव याच उन्हाच्या भरात प्रकट करत असतो. गुढीपाडव्यानंतर कुणाच्या खिजगणतीतही नसलेले कडुनिंबाचे झाड निळसर तुऱ्यांनी लगडलेले असते. उग्रगंधाची घाणेरीसुद्धा फुलांनी ओतप्रोत भरली आहे. एरवी हे झाड किती दुर्लक्षित असते. पण भर उन्हात वेगवेगळ्या रंगछटांची ही वनस्पतीही आनंददायक ठरते. आपण तुच्छतेने तिला घाणेरी म्हणतो आणि तिच्या अतुलनीय रंगसौदर्याला उपेक्षून पुढे जातो. पण गुजरातीत चुनडी असे सुंदर व यथार्थ नामाभिधान या झाडाला दिलेले आहे आणि हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगांचे रहस्य मला उलगडले, असा उल्लेख ज्येष्ठ लेखिका दुर्गा भागवत यांनी त्यांच्या ऋतुचक्र या पुस्तकात केला आहे.
ताठ खडा असणारा अशोक (मात्र नर अशोक) हिरव्याकंच पर्णसंभाराचे वैभव घेऊन उभा असतो. पिंपळाचा पार दाट सावलीने थकल्या वाटसरूला आणि उन्हाने कोळपलेल्या आपल्या नजरेला केवळ दर्शनानेच आश्वस्त करत असतो. गुलाबी रंगात न्हालेली मधुमालतीही कुठल्यातरी वृक्षाला लपेटून उभी आहे. सुरंगीची झाडेही केशरी पराग आणि पांढऱ्या पाकळ्यांनी सजली आहेत. जांभळाच्या झाडाने नव्या पानांचा पोषाख घातला आहे. आंबा आणि फणसाची झाडे हे तर चैत्र-वैशाख महिन्यांचे खरे वैभव.
पण आपल्याला हे सारे पहायला वेळ आहे? यंत्रवत बनलेलं आयुष्य जगताना, जीवघेण्या स्पर्धेत गतीने धावताना क्षणभर तरी आपली नजर आपल्या भोवतालच्या या रूपरसगंधाच्या दुनियेवर स्थिरावणार आहे का? यांत्रिक-तांत्रिक बाबीत दिवसेंदिवस अधिकाधिक गुरफटत चाललेले आपले जगणे निसर्गाच्या या मुक्त निसर्गाविष्काराकडे एक नजर पाहण्याइतकेही निवांत उरले नाही का? आपल्या आयुष्याला अधिक सुंदर, अर्थपूर्ण करणारी ही निसर्गचिन्हे आणि त्यांच्यातले अर्थ आपण दृष्टीक्षेप टाकला तरी समजून घेता येणारी आहेत. आपल्याला निसर्गतः लाभलेल्या ज्ञानेंद्रियांनी हे सामर्थ्य दिले आहे. पण आपली नजर फक्त बॅंक बॅलन्स वाढविण्यात गुंतली असली तर हे सारे सौंदर्यसोहळे आपल्या कायम नजरेआडच राहतील, याची जाणीव आता तरी आपल्याला होणार की नाही?