– अरुणा सरनाईक
वसंताच्या सुरम्य त्रिदलातील तिसरे दल म्हणजे वैशाख. संपूर्ण उन्हाळ्याचे प्रखर तारुण्य. कोणतीही गोष्ट असो जेव्हा ती परमकोटीला पोहोचते तेव्हाचे त्याचे सारे उन्माद, जोश, सारे जलवे दृष्टीस अपार सुख देतात. वैशाख म्हणजे भर तारुण्याचा उन्माद! एखाद्या रांगड्या दिमाखदार शेतकऱ्यासारखा उघड्या रानमाळावर मिरवणाऱ्या वैशाखाचा तोरा बघण्यासारखा असतो. असा हा फिरवणारा तापवणारा वैशाख स्वत: मात्र एकाकी असतो. विमनस्क असतो. सारं काही मनसोक्त दिल्यावर एकाएकी स्वत:शी रमणारा तरुण वैशाख नक्कीच विचार करायला भाग पाडतो. रानशेतातील पक्व पिकं घरी येऊन भरून पावलेली असताना, हिरव्या रंगाचा भरजरी शेला अंगावर पांघरून आम्रराज ध्यानस्थ बसलेला. साऱ्या वातावरणात एक निश्चलता असते पण ही निश्चलता असते ती तृप्तीची असते.
असोशीची नाही. प्रखर उन्हात जणू हिरवा रंग आपल्या अंगभूत गुणांनी वेगवेगळी रूपे धारण करून डोळ्यांना शीतलता देतो. किती म्हणून हिरव्या रंगाच्या छटा बघायला मिळतात. पावसाळ्यातील पाण्याने ओथंबलेला हिरवा रंग डोळ्यांना सुखकारक असतो. पण कडक उन्हात आजच्या सतेज हिरवेपणात डोळ्यांना निवविण्याची ताकद मात्र वैशाखातल्या हिरव्या रंगातच असते. वृक्षराज आम्रवृक्षाचं वर्णन करायला थोर महाकवी कालिदासाची कल्पनाशक्ती दरवेळी बहरणाऱ्या आम्रवृक्षांचे वर्णन करताना नव्यानं बहरून येते.
तरीही हा वैशाख स्वत:ची जखम सांभाळत फिरणाऱ्या एकाकी अश्वत्थाम्यासारखा विमनस्क वाटतो. याच्या पूर्णत्वात देखील एकाकीपण आहे किंवा याच्या एकाकीपणात पूर्णत्व सामावले आहे. जुन्या गढीतल्या एकाकी वास्तुपुरुषाप्रमाणं याचं वागणं असतं. सारी सृष्टी तेजस्वी, तीव्र उन्हाच्या माऱ्यामुळे होणारी तगमग विश्रब्धपणे सोसत असते. सारी मुग्धता सोसून येणाऱ्या पावसाची वाट बघत असते. जेव्हा ही तिची तगमग अगदीच असहनीय होते तेव्हा केवळ पावसाच्या आगमनाची वर्दी देणारे वळीवाचे काही चोरटे तुषार तिची होणारी काहिली दूर करतात. अशा वैशाखाच्या उन्हाळी काळजातून विविधरंगी फुलं फुलतात. चाफा, देवचाफा, सोनचाफा वळस पांगाऱ्यासारखी झाडं बरोबरीनं फुलतात. पेटत्या निखाऱ्याप्रमाणे दिसणारे तरीही ऐन उन्हाच्या धगीत डोळ्यांना सुखविणारे गुलमोहोरसुद्धा वैशाखात बहरून येतात. जणूकाही उन्हाळ्याचं उकळतं रक्तं या फुलांमधून सांडत.
चाफा! त्याचे कितीतरी प्रकार. सर्वदूर त्याचं साम्राज्य. पांढरा, पिवळा, गुलाबी, गडद लाल आणि हिरवा चाफा. हा तर प्रियजनांचा अत्यंत लाडका. प्रेमाच्या कितीतरी आठवणी याच्याशी निगडीत असतात. जणू चाफा म्हणजे प्रेमिकांचे स्मरणचिन्ह. ओबडधोबड झाडावर मोठ्या हिरव्याकच्च पानाआड दडलेलं. पांढऱ्या, पिवळ्या, गुलाबी रंगाची फुले कितीतरी आठवणी जाग्या करतात. हा आठवणींचा स्मरण महोत्सव दरवर्षीचा सोहळा असतो. कधीतरी तरुणपणात अबोल प्रीतीची खूण म्हणून हृदयी जपलेला चाफा सुकत असला तरीही दरवर्षी फुलल्यावर आठवणी जाग्या करण्याचे काम नियमितपणे करतो. हळूहळू वयानुसार संदर्भ बदलतात, आपणही बदलतो.
पण ऋतूंमध्ये प्रचंड ताकद आहे आठवणींना जागं करण्याची. आले चाफ्याला तुरे शुभ्र फुलांचे, मनात आठव दाटले पांगल्या प्रियजनांचे. हिरवा चाफा पानांशी लगट इतकी की फुलं कोणतं? पानं कोणतं? कळणारच नाही. पण दरवळणाऱ्या सुगंधाची लगेचचं ओळख होते. यावरून एक नितांतसुंदर मराठी गाणं आठवतयं ः लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का? प्रीत लपवुनि लपेल का? ऋतूंच्या सहवासानं कवीच्या काव्यप्रतिभेला आलेला बहर कितीतरी गीतांमध्ये व्यक्त झालेला आहे.
वैशाखापासून दिवस मोठे, दीर्घ होतात. रात्री लहान आणि गहिऱ्या होतात. सायंकाळ आणि पहाट आल्हादकारी असतात. सायंकाळ जसजशी गडद होत जाऊन रात्रीत मिसळते तसतसे तिचे स्वरूप बदलते. चंद्रप्रकाशाचे काय वर्णन करावे? वैशाखाचा तो चंद्र अधिकच मदीर असतो. निलगिरीची झुलती फांदी, कडुलिंबांचा सळसळता मदभरला शीत वारा पांढऱ्या निळ्या आकाशातला तो वैशाखी पौर्णिमेचा पूर्णचंद्र आणि त्याचा तो प्रकाश. चंद्राच्या शीतलतेची जाणीव व्हावी, आस्वाद मिळावा यासाठी वैशाखी पौर्णिमा बघावी. या पौर्णिमेचा सौंदर्यस्पर्श जितका सचेतन वाटतो, जीवनदायी वाटतो तितका शरदातल्या किंवा आश्विनातल्या पौर्णिमेचा वाटत नाही. शारदीय पौर्णिमा स्वर्गीय वाटते गूढ रम्य वाटते, पण अपार्थिव वाटते. मात्र, वैशाखाची पार्थिव वाटते. शरीरासकट मनाला शीतलता देते.
हाकेच्या अंतरावर चंद्र असतो. रात्रभर तो तुमच्या सोबत जागत असतो. आकाशभर चंद्र व्यापून तुमच्यापर्यंत तो कसाही पोहोचतो. घनदाट वैशाखी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात संवेदना जागृत करण्याचे, तरल करण्याचे अमोघ सामर्थ्य आहे. ही पौर्णिमा आपल्याला अनेक बाजूंनी तृप्त करते मोगऱ्याच्या सुगंधातून, कडूलिंबाच्या सावलीच्या मत्त गंधातून, सोनचाफ्याच्या मादक रसिल्या सुवासातून. वसंताच्या सुखद सुरुवातीला, प्रारंभाला पूर्णविराम देण्याचे काम वैशाखाचे. सुखाच्या परमकोटीला पोहोचून देखील विरागीपणाने तो त्याचे अवलोकन करतो. इथे त्याचा मूड एखाद्या प्रज्ञायोगापेक्षा कमी नसतो.
तसंही “देता किती घेशिल दो कराने’ असा निसर्गाचा आग्रह असतोच असतो तो आपण कसा घेतो ते आपण ठरवायचे असते. असा हा वैशाख आत्ममग्न तरीही विमनस्क संन्यासी. पण तृप्त सर्जनशीलतेतील अखेरचा वाटा उचलून भर माथ्यावर पोहोचून देखील झपाझप आपल्या अंतिम ध्येयाकडे वाटचाल करणारा बैराग्यासारखा वैशाख आहे. उघड्या रानमाळाचा स्वामी काही काळासाठी वसंताच्या चैत्रासोबत सखा बनून आला. कार्य निर्विघ्नपणे पार पाडल्याचं समाधान. त्या समाधानात देखील संयमाची भान राखणारा वैशाख आपल्या गंतव्याकडे परतत आहे. मित्र कर्तव्य पार पाडण्याचं समाधान, त्यात शरीरावर मनावर पडलेले सुखद क्षणांचे काही थरार घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेला पाथेय वैशाख…