– अरुण गोखले
पाऊस निसर्गातला एक सुखद चमत्कार. निसर्गातलं जलचक्र हे जेव्हा त्याच्या पूर्णावस्थेस येते तेव्हा अचानक आभाळ काळ्या ढगांनी भरून येते आणि तापलेल्या मातीवर, मानवी मनावर हा पहिला वहिला पाऊस एक सुखद शिडकावा करून जातो. त्या पहिल्या पावसाने जसा तापलेल्या मातीचा एक विलक्षण असा सुगंध कसा सगळीकडे पसरतो तसाच हा पाऊस माणसांच्या मनातही आनंदाचा वर्षाव करतो. अंगणात फेर घरून नाचणारी लहान मुलं येरे येरे पाऊसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, असं म्हणत नाचतात, गातात आणि आनंदीत होतात.
हा असा बरसणारा पाऊस जसा मनाला सुखवीत येतो तसाच तो कवी लोकांच्या मनातील काव्यपंक्ती फुलवीत येतो. तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात नवी आशा जागविता येतो. मग ओठावर येतात ती बहारदार पाऊस गाणी. या पाऊस गाण्यात विविध भाव भावनांचे आविष्कार असतात. मग असंख्य गीतांना नकळत जन्म मिळतो.
या गाण्यात पावसाला घातलेली साद, त्याचे आगमन, त्याची विविध रूपं आणि त्या पावसाच्या वेगवेगळ्या रूपामुळे मानवी मनात उठणारे आनंद तरंग, चिंता, काळजी, भीती यासारख्या भावना व्यक्त करणारी कविता-गाणी तयार होतात. त्यात कुठे रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे, पाणीच पाणी चहुकडे गं बाई, गेला मोहन कुणीकडे? अशी तक्रार आणि भीती, काळजी, चिंता व्यक्त केली जाते. तर कुठे रौद्ररूप धरून मानवी जीवन उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या या पावसालाच नको नको रे पावसा, असा घालू धिंगाणा म्हणून विनंतीही केली जाते. प्रेयसीची वाट पाहणारा प्रियकर त्याला अशीही विनंती करतो की, ए बादल, यू न बरसना कि वो आ न सके। और आने पर यु बरसना की वो जा न सके! खरंच निसर्गातला पाऊस हा घटक मानवी जीवनाशी किती जवळचा आहे, नाही का?