मुंबई – ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर अर्थात ‘सुलोचना दीदी’ यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. वृद्धापकाळ आणि श्वसनाच्या आजारामुळे त्यांनी दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या 94 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील कलाकरांसह राजकीय नेते मंडळींनी शोक व्यक्त केला. आज सोमवार 5 जून रोजी सुलोचना लाटकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुलोचना दीदी यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचे पार्थिव त्यांच्या प्रभादेवी येथील घरी आज सकाळी 11 वाजता अत्यंत दर्शनासाठी ठेवणार आहेत.
“पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे,” अशा शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात आपल्या सहजसुंदर अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी लाटकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तीमत्व हरपले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 4, 2023
शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, सुलोचना दीदींनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांनी विशेषतः ‘आई’च्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. काळाने त्यांना आपल्यातून ओढून नेल्याने आपण एक चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ गमावली आहे, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना आणि चित्रपट सृष्टीतील स्नेह्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
दरम्यान, सुलोचना दीदींनी 1946 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सुलोचना दीदी यांनी 250 हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, सुनील दत्त या अभिनेत्यांच्या आईची भूमिका त्यांनी साकारली आहे. सुलोचना दीदी यांना 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने आणि 2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय 2009 मध्ये चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारही त्यांना देण्यात आला आहे.