पिंपरी – आपले घर, आई-वडील, भावंडे, सर्व काही सोडून ती एका नव्या घराचा उंबरठा ओलांडते… मनात धाकधूक आणि डोळयात अनेक सुंदर स्वप्ने घेऊन ती येते… तिला म्हटले तर जाते घराची लक्ष्मी…परंतु या गृहलक्ष्मीकडूनच संपत्ती आणण्याच्या अपेक्षा बाळगल्या जातात…नव्या नवरीचे नऊ दिवस संपतात ना संपतात तोच सुरू होतो हुंडा, लग्नातील मानपानाविषयी छळ. काही घरात तर एवढा छळ होतो की तिला पोलीस ठाण्याचे दार ठोठावावे लागते. काही आतून इतक्या तुटतात की ज्या गळ्यात कधी वरमाळा घातलेली असते त्याच गळ्यात गळफास अडकवितात. शहरात गेल्या चार महिन्यांत 7 नवविवाहितांनी आत्महत्या केल्या आहेत.
आज समाज पुढारला आहे. अनेकजण आम्हाला मुलगी आणि नारळ द्या, असे म्हणत असले तरी, नंतर विविध कारणांनी नवविवाहितांची छळवणूक हात रहाते. या त्रासाला कंटाळून शेवटी महिला आत्महत्येचे पाऊल उचलतात. आपली मुलगी सुखी रहावी किंबहुना मुलीचा हक्क म्हणून वस्तूंच्या स्वरूपात संपर्ण संसार देतात. लग्नातील मानपानावरून नवविवाहितेची छळवणूक करतात. पूर्वी हुंडा रोख रक्कम किंवा सोन्याच्या स्वरूपात दिला जात होता. आता लग्नात हुंड्याऐवजी महागड्या वस्तूंची मागणी केली जाते.
मानपान करून घेतला जातो. नंतर तो नीट झाला नाही, म्हणून छळवणूक सुरू होते. आपल्या माहेरच्यांना त्रास नको म्हणून अनेक महिला टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करत आहेत. 1 जानेवारी 2023 ते 30 एप्रिल या कालावधीत 7 नवविवाहित महिलांच्या आत्महत्या केल्याच्या गुन्हाची नोंद पोलिसांकडे आहे. केवळ एप्रिल महिन्यात आत्महत्या केलेल्या 3 नवविवाहितांच्या गुन्हाची नोंद आहे.
मे महिना लग्नसराईचा
करोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन-तीन वर्षे लग्न साध्या पद्धतीने उरकरण्यात आली होती. यंदा मात्र मे महिन्यात लग्नाचे बार उडाले. अनेकांच्या लग्नाचा थाट पहाण्यासारखा होता. कायद्याने बंदी असलेला हुंडा विविध महागड्या वस्तू, सोने तसेच घरगुती टीव्ही, फ्रीज, एअर कंडिशनर, चारचाकी आदी वस्तूंच्या स्वरूपात दिला जात आणि घेतला जात होता. मंगल कार्यालयांबाहेर महागड्या गाड्यांची रिघ लागलेली दिसत होती. त्यामुळे देणारे आणि घेणारे यांची संख्या वाढताना दिसत आहे.