तळेगाव दाभाडे – साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या टायर असलेल्या बैलगाड्यांचा वेग नियंत्रित करण्यासाठी ब्रेक बसविता येतो, असे संशोधन महिंद्रा कंपनीचे गुणवंत कामगार संदीप पानसरे यांनी केले आहे. त्यामुळे तीव्र उतार व तीव्र चढ पार करताना या बैलगाड्यांवर नियंत्रण मिळविता येणे शक्य होणार आहे.
राज्यातील साखर कारखाने सरासरी 10 किलोमीटर परिसरातून ऊस वाहतूक करण्यासाठी टायर बैलगाडीचा वापर करतात. कारखान्यांच्या परिसरातील तीव्र चढ -उतार असलेल्या ठिकाणावरून गाडीवाले व त्याचे कुटुंब व बैल जोडी यांची दररोज जीव धोक्यात घालून ऊस वाहतूक करत असतात.
महिंद्रा कंपनीचे संदीप पानसरे यांनी ही धोकादायक परिस्थिती पाहिल्यावर यातून सुरक्षित राहण्यासाठी काही मार्ग काढता येईल का, यावर विचार सुरू केला. हा धोका टाळण्यासाठी टायर बैलगाडीला ब्रेक लावल्यास धोका टळू शकतो. याबाबत त्यांनी श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी राजेंद्र वणवे यांच्याकडे ही संकल्पना मांडली.
त्यांनी याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेबराव पठारे यांच्याशी चर्चा केली. पठारे यांनी टायर गाडीला ब्रेक बसवण्याच्या कामास परवानगी दिली व कारखान्याच्या वर्कशॉपमध्ये रिकामी टायर बैलगाडीदेखील उपलब्ध करून दिली. पानसरे यांनी ऊस टायर बैलगाडीवर संशोधन सुरू केले. दोन्ही चाकांना हबवर ब्रेक ड्रम व लायनर लावून ब्रेक बसविला आणि त्याचा हॅंडल गाडीवाल्याना दिला.
ब्रेक बसवलेल्या रिकाम्या गाडीच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर गाडीमध्ये दोन- तीन टन ऊस भरून उतारांवरून चाचण्या घेण्यात आल्या. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचे गाडीवाले व त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेबराव पठारे तशेच कारखान्याचे अधिकारी राजेंद्र वणवे व मोहन काळोखे तसेच इतर अधिकाऱ्यांसह चाचण्या घेऊन ब्रेक यशस्वी झाल्याचे सांगितले. महिंद्रा कंपनीचे विनायक कडसकर, सुधाकर राणे, रवी वैद्य , विजय मोकाशी, स्वप्नील पाटील, तुषार कुळकर्णी, नितीन सोनवणे यांनी मदत व मार्गदर्शन केले.