नवी दिल्ली – बांगलादेशात होणारी साखरेची तस्करी सीमा सुरक्षा दलाने पकडली आहे. मेघालयातील सीमा सुरक्षा दलाने साखरेच्या गोण्या भरलेल्या 7 बोटी पकडल्या आहेत. या गोण्यांमध्ये 29 हजार किलो साखर असल्याचे तपासणीमध्ये उघड झाले आहे. या साखरेची किंमत 11 लाख रुपये इतकी आहे, असे “बीएसएफ’च्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. मेघालयमधील पश्चिम जयंतिया जिल्ह्यात 14 जुलै रोजी “बीएसएफ’ने ही कारवाई केली.
गोपनीय माहितीच्या आधारे “बीएसएफ’ने या परिसरामध्ये बारीक लक्ष ठेवले होते. या परिसरामध्ये काही संशयास्पद हालचाली दिसल्यावर नदीतून जाणाऱ्या बोटींचा पाठलाग करून त्या पकडण्यात आल्या. बोटीतील व्यक्तींची कसून चौकशी केली गेली आणि बोटींची तपासणी केली गेली. त्यामध्ये ही साखरेची तस्करी उघड झाली. जप्त करण्यात आलेली साखरेची पोती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आली.
यापूर्वी मेघालयमधील इस्ट खांसी हिल्स जिल्ह्यामध्ये “बीएसएफ’ने बांगलादेशात केली जाणारी कापडाची तस्करीही अशीच उगड केली होती. आंतरराष्ट्रीय सीमेवर 13 लाख रुपयांच्या साड्या पकडण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळी तस्कर घनदाट जंगलामध्ये पळून गेले होते.