औरंगाबाद – तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणे नवीन नाही. यापूर्वीही राव यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. भूतकाळतही असे ऐक्याचे करण्यात आलेले प्रयत्न अयशस्वी ठरले होते, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
औरंगाबादमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात पक्षांना एकत्र आणत तिसरी आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. यावर त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला चिमटा काढला.
फडणवीस म्हणाले, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे भेटणे नवीन नाही. राव यांनी 2014 ते 2019 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही त्यांची भेट घेतली होती. याआधीही हे नेते 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधात एकत्र आले होते. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. यापूर्वीही भूतकाळामध्ये अनेक प्रयोग करण्यात झाले आहेत. पण त्याचा कोणताही परिणाम झाला नाही, असे त्यांनी सांगितले.
सध्या राव यांच्या टीआरएसची सत्ता असलेल्या तेलंगणात भाजप लवकरच आघाडीवर असेल, असा दावाही त्यांनी केला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तेलंगणत चार जागा जिंकल्या. आगामी काळात आमचा पक्ष त्या राज्यात पहिल्या क्रमांकावर असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.