नगर – शिवभोजन केंद्र चालकांचे सात महिन्यांचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे केंद्र चालविणे अवघड झाल्याची व्यथा जिल्ह्यातील शिवभोजन चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. त्यांनी जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना भेटून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
महाविकास आघाडीचे राज्यात सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा रुपयांमध्ये गरिबांना जेवण देण्याची महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन’ योजना राज्यात 2020 मध्ये लागू केली.
करोना काळात या योजनेमुळे हजारो व्यक्तींची भूक भागली होती. देश बंद असतानाही गरीब व गरजूंना दहा रुपयांत पोटभर जेवन मिळाले होते. राज्यात सत्तांतर झाले. शिवसेना आणि भाजपची सत्ता आल्यावर या योजनेचे अनुदान देण्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. नोव्हेंबर 2022 पासून सात महिन्यांचे अनुदान रखडले आहे. भाजीपाला, किराणा आणि गॅस घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे शिवभोजन चालक कर्जबाजारी झाले आहेत.
कर्ज काढून भोजन
शिवभोजन योजना ही करोना काळात गोर-गरिबांसाठी जीवनदायी ठरली. अशा सारख्या संकट काळात शिवभोजन चालकांनी जीवाची पर्वा न करता गोरगरिबांना जेवण दिले. आता शिवभोजन चालकांचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे चालक अडचणीत आले आहेत. कर्ज काढून भाजीपाला, किराणा, गॅस खरेदी करावा लागत आहे. जागेचे भाडे. वीज बिल, कर्मचाऱ्यांचे पगार द्यावे लागत आहेत. अनुदान वेळेवर न मिळाल्यास ही योजना चालविणे अवघड जात आहे, असे साईराम घोरपडे यांनी सांगितले.