श्रीरामपूर – नियोजित जिल्हा मुख्यालयासाठी श्रीरामपूर शहर हेच योग्य असून, शिर्डीतील कार्यालय श्रीरामपूरला हलवण्यासाठी श्रीरामपूर शहर व तालुक्यात शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. राज्य सरकारने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केल्यामुळे हा बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्रीरामपुरातील मेन रोड, शिवाजी रोड, संगमनेर रोड, नेवासा रोड, या सर्व प्रमुख रस्त्यांवरचे छोटे-मोठे व्यावसायिकांची दुकाने टपऱ्या बंद होत्या. त्याचबरोबर शहरातील प्रभाग दोन, गोंधवणी रोडवरील सर्व व्यवहार बंद ठेवून आजच्या बंदला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळाला.
सकाळी गांधी पुतळ्याजवळ स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीतर्फे श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना देण्यात आले. या वेळी बाबा शिंदे, सुभाष त्रिभुवन, संदीप मगर, प्रेमचंद कुंकूलोळ आदी उपस्थित होते. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनाही कॉंग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. या वेळी सचिन गुजर, अंजूम शेख, अशोक कानडे, आशिष धनवटे अशोक बागुल यांच्यासह कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, शहरातील मर्चंट असोसिएशनने बंदमध्ये सहभाग घेतल्यामुळे सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. शहरात सकाळी दुचाकीवरून रॅली काढण्यात आली. ग्रामीण भागामध्येही बंद पाळण्यात आला. टाकळीभान, वडाळा महादेव, बेलापूर, उंदिरगाव येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे व्यवहार ठप्प झाले. गेल्या अनेक वर्षांपासून नगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूरला नवे मुख्यालय करण्याची मागणी आहे. यासाठी वेळोवेळी सरकारदरबारी पाठपुरावा करण्यात आला होता. जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक सर्व सरकारी कार्यालय येथे कार्यरत आहेत.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, पासपोर्ट कार्यालय, जिल्हा न्यायालय यांची यापूर्वीच येथे स्थापना केली गेली. त्यामुळे भविष्यातील मुख्यालयाचे ठिकाण म्हणून श्रीरामपूरकडे पाहिले जात होते. मात्र, मंत्रिमंडळाने नुकतेच शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्याकरिता पाठपुरावा केला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे श्रीरामपूरच्या जिल्हा मुख्यालयाच्या मागणीला धक्का बसला आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातून रोष व्यक्त होत आहे.