हिंजवडी – जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीहल्ला व राज्य सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ बुधवारी (दि. 6) हिंजवडी, माण आयटी परिसरातील पाच-सहा गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.आयटी पार्कचा समावेश असलेल्या माण, हिंजवडी, मारुंजी, नेरे, जांबे, कासरसाई या सहा गावांनी मिळून लाठीहल्ल्याच्या विरोधात स्थानिक पातळीवर दुकानदार व स्थानिक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंदला प्रतिसाद दिला.
सकल मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला व अश्रूधुर सोडून मारा केला होता. यात अनेक युवक, महिला, कार्यकर्ते गंभीर जखमी झाले होते. या अत्याचाराच्या विरोधात केंद्र व राज्य सरकारची भूमिका संदिग्ध असल्याने आयटी पार्क परिसरातील सहा गावांतील ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी बंदची हाक दिली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदला प्रतिसाद दिला.
मेडिकल स्टोअर, दवाखाने व दुग्धजन्य पदार्थांच्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व हॉटेल्स, दुकाने बंद ठेवून लाठीहल्ल्याचा निषेध नोंदवत व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला. माणच्या माणदेवी चौकात सरकारविरोधी घोषणा देत शेकडो कार्यकर्त्यांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन केले. या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रत्येक गावांत हिंजवडी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. स्थानिक ग्रामपंचायत तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारविरोधी घोषणाबाजी करत शांततेत निदर्शने करण्यात आली. या वेळी अनेकांनी मनोगतातून सरकारच्या संदिग्ध भूमिकेबद्दल आपल्या तीव्र भावना मांडल्या. या वेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन पोलीस व महसूल प्रशासनाला सुपूर्द केले.
मराठा तरुणांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका
इतर राज्यांमध्ये जर मराठा समाजाला आरक्षण दिले जाते तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी महायुतीच्या सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. मराठा समाजातील तरुणांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा राज्यात पुन्हा मोठमोठे मोर्चे निघून उद्रेक होईल. अशा भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या.
बंदचा आयटी क्षेत्रावर परिणाम नाही
बुधवारी स्थानिक ग्रामस्थांनी पाळलेल्या बंदचा आयटी क्षेत्राच्या कामकाजावर कुठलाही परिणाम झाला नाही. सर्व देशी, विदेशी कंपन्यांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू होते. आयटीतील सर्व रस्त्यांवर वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. त्यामुळे या बंदचा कुठलाही परिणाम आयटीक्षेत्रावर जाणवला नाही.