मुंबई, दि.16- अनेक नकारात्मक बाबींमुळे कालपासून भारतीय शेअर बाजारात विक्रीचे वातावरण आहे. आज सकाळी काही आशावादी गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी केली होती. मात्र नंतर निर्देशांकांना पातळी कायम राखता आली नाही आणि कालच्या तुलनेत निर्देशांक माफक प्रमाणात कमी झाले.
बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 31 अंकांनी म्हणजे 0.06 टक्क्यांनी कमी होऊन 50,363 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 19 अंकांनी घसरून 14,910 अंकावर बंद झाला.
एल अँड टी, आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक, कोटक बॅंक, एचडीएफसी बॅंक, ऍक्सिस बॅंक, बजाज फिन्सर्व या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. मात्र एशियन पेंट्स, डॉक्टर रेड्डीज, भारती एअरटेल या कंपन्यांना थोडाफार खरेदीचा आभार मिळाला.
रिलायन्स सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण असूनही भारतीय शेअर बाजारात मात्र विक्रीचे वारे कायम राहिले. काल घाऊक महागाई वाढल्याचे आकडेवारी जाहीर झाली आहे. त्या अगोदर किरकोळ महागाई वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली होती. एकीकडे महागाई वाढत असताना औद्योगिक उत्पादन कमी झाले आहे.
त्यातच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या कारणामुळे नजीकच्या भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असे गुंतवणूकदारांना वाटते. याशिवाय भारताच्या दृष्टीकोनातून आणखी एक डोकेदुखी म्हणजे क्रुडचे दर वाढत आहेत. त्यामुळे भारताला क्रुड आयातीसाठी बरीच रक्कम मोजावी लागणार आहे.