मुंबई – सकाळच्या सत्रात बरीच खरेदी होऊन शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. मात्र बाजार बंद होताना विक्री वाढली. त्यामुळे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 48 अंकांनी कमी होऊन 55,769 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 43 अंकांनी कमी होऊन 16,584 अंकांवर बंद झाला.
अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, एनटीपीसी, बजाज फिन्सर्व, इंडसइंड बॅंक, ऍक्सिस बॅंक, महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी झाले तर रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो, सनफार्मा, विप्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. जागतिक बाजारात वातावरण सकारात्मक होते.
दक्षिण कोरिया, जपान येथील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. मात्र चीनमध्ये शेअर बाजारांना सुट्टी होती. युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. अमेरिकन शेअर बाजारातही खरेदी झाली. युद्ध आणि इतर कारणामुळे जागतिक परिस्थिती कमालीची लवचिक आहे.
त्यामुळे गुंतवणूकदारांना निर्णय घेणे सध्याच्या परिस्थितीत अवघड झाले असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा विक्रीचा जोर आता कमी झाला असला तरी काल या गुंतवणूकदारांनी 451 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली असल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली.
पुढील आठवड्यात होणाऱ्या रिझर्व बॅंकेच्या पतधोरणाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. रिझर्व बॅंकेने व्याजदरात अगोदरच 0.40 टक्के वाढ केली आहे. पुढील आठवड्यामध्ये आणखी0.25 ते 0.35 टक्के वाढ अपेक्षित आहे. मात्र आगामी काळाबाबत रिझर्व बॅंक कोणती भाषा करते याकडे गुंतवणूकदारांचे जास्त लक्ष आहे. जर वर्षभर रिझर्व बॅंकेने कडक पत धोरण राबविण्याचे संकेत दिले तर शेअर बाजाराचे निर्देशांक घसरू शकतात असे जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.