मुंबई – करोनाच्या काळात बऱ्याच लोकांनी डिमॅट खाते उघडून शेअरबाजारात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांमध्ये रिटेल गुंतवणूकदारांची गुंतवणूक डिसेंबरअखेर 7.32 टक्क्यांपर्यंत गेली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये हेच प्रमाण 7.13 टक्के इतके होते. शेअर बाजारात या गुंतवणूकदारांचे तब्बल 18.98 लाख कोटी रुपये असल्याचे दिसून येते.
मात्र याच काळात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या तिमाहीत 38,521 कोटी रुपयांची विक्री केली. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराचे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणुकीचे प्रमाण कमी होऊन ते 20.74 टक्क्यावर आले आहे. राष्ट्रीय शेअर बाजारावर नोंदलेल्या 1,768 कंपन्यांपैकी 1,714 कंपन्यांच्या आकडेवारीचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल तयार करणाऱ्या प्राईम डाटाबेस समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव हलदीया यांनी सांगितले की, या कालावधीत सेन्सेक्स 1.48 टक्क्यांनी तर निफ्टी 1.50 टक्क्यांनी कमी होऊनही या काळात रिटेल गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढली आहे. त्या काळात श्रीमंत गुंतवणूकदारांची म्हणजे ज्यांची गुंतवणूक दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढून 2.26 टक्क्यांपर्यंत गेली आहे. त्यामुळे एकूण रिटेल गुंतवणूक 9.58 टक्क्यांपर्यंत गेली आहे.
डिसेंबर 2021 मध्ये म्युच्युअल फंडाची शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवून 7.47 टक्के इतकी झाली आहे. मार्च 2020 मध्ये म्यूच्युअल फंडाची शेअर बाजारातील गुंतवणुकीचे प्रमाण 7.96 टक्के होते. आता म्युच्युअल फंडाचे शेअर बाजारामध्ये 19.36 लाख कोटी रुपये आहेत. त्यामुळे रिटेल गुंतवणूकदार व म्युच्युअल फंडाची शेअर बाजारातील गुंतवणूक 17.05 टक्क्यांवर गेली आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसीची 278 कंपन्यांमध्ये गुंतवणूक एक टक्क्यापेक्षा जास्त असून एलआयसीचे शेअर बाजारातील गुंतवणुकीचे प्रमाण कमी होऊन 3.67 टक्के इतके झाले आहे. 2012 मध्ये एलआयसीची गुंतवणूक पाच टक्के इतकी होती.
देशातील संस्थागत गुंतवणूकदारांची शेअर बाजारातील गुंतवणूक कमी होऊन 13.22 टक्के इतकी झाली आहे. त्यामध्ये म्युच्युअल फंड, विमा कंपन्या, वित्तीय संस्था, पेन्शन संस्थांचा समावेश असतो. परदेशी आणि देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांची शेअर बाजारातील गुंतवणूक कमी होऊन 33.95 टक्के इतकी झाली आहे. या अगोदर या गुंतवणूकदारांची गुंतवणूक 34.59 टक्के इतकी होती.