मुंबई – तिसऱ्या तिमाहीत बॅंका, माहिती-तंत्रज्ञान, धातू, दूरसंचार, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यात वाढ होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे खरेदी चालूच असून शेअर बाजार निर्देशांकांची आगेकूच कायम राहिली.
मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 221 अंकांनी वाढून 60,616 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 52 अंकांनी म्हणजे 0.52 टक्क्यांनी वाढून 18,055 अंकांवर बंद झाला.
एचसीएल टेक, एचडीएफसी, टेक महिंद्रा, रिलायन्स, सन फार्मा, स्टेट बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात 4.3 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. टाटा स्टील, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे गुंतवणूक संशोधक व्ही के विजयकुमार यांनी सांगितले की, लवकरच तिसऱ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. माहिती तंत्रज्ञान,धातू, दूरसंचार, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्या नफादायक राहतील असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.
ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे जागतिक बाजारात विक्रीचा मारा चालू होता. मात्र त्याकडे भारतीय गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष करून खरेदी चालू ठेवल्याचे वातावरण होते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी 124 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. फेडरल रिझर्व्हच्या लवकरच जाहीर होणाऱ्या पतधोरणाकडे परकीय संस्थागत गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. जर रिझर्व्हने आक्रमक व्याजदर वाढीचे धोरण जाहीर केले तर परदेसी संस्थागत गुंतवणूकदार विक्री वाढवतील. भारतीय शेअर बाजारात या गुंतवणूकदारांची 28 टक्के इतकी गुंतवणूक आहे.