नगर -राज्य सरकारने बेताल वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांना आवरले पाहिजे. सरकारला आता 5 ते 6 महिने झाले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न आहेत, त्यावर लक्ष देण्याचे सोडून नुसत्या बतावण्या करण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.
शनिवारी पवार नगरमध्ये आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की जे कर्नाटकचे लोक वाहनांना लक्ष्य करत आहेत. मराठी माणसांवर अन्याय करत आहेत. त्यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे. मात्र, या सरकारने त्यांच्या कर्नाटक बॅंकेला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कोणती पद्धत आहे, असा सवाल त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की लोकशाही आहे. निवडणुकीत त्यांना बाजूला करण्याची ताकद व धमक जनतेत आहे. हे त्यांनी विसरू नये तसेच आम्हीही विसणार नाही आणि भविष्यात जे कुणी सत्तेत असतील त्यांनीही विसरता कामा नये. लोकशाही टिकली तर आपण टिकू आणि राज्य एकसंघ राहिले, असे त्यांनी सांगितले.