मुंबई – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मागील तीन महिन्यांत शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, तरुण, विद्यार्थी महिला, सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही. या सरकारच्या गलथानपणामुळे राज्य अधोगतीला गेले असून जनतेमध्ये प्रचंड संताप आणि निराशा आहे.
राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी आंधळे, मुके, बहिरे “ईडी’ सरकार बरखास्त करावे, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
राज्यासमोरील संकट आणि जनतेला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. बहुतांश जिल्ह्यामध्ये खरीप पीक पूर्णपणे वाया गेले आहे. कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मका, उडीद ही सर्वच पीके शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने वाढवली, त्याला खते आणि कीटकनाशके यासाठी मोठा खर्चही केला होता. मात्र पीके हातात येण्याच्या आधीच वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
या शेतकऱ्याला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला मदतीचे पॅकेज देण्याची आवश्यकता आहे. पण अद्याप सरकारने ओला दुष्काळही जाहीर केला नाही आणि शेतकऱ्यांना मदतही दिली नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.