कराड -पुणे-मुंबईस्थित अनेक नागरीक आपल्या गावी परतू लागले आहेत. कराड शहरातही अनेक नागरीकांचा लोंढा वाढल्याने पालिकेच्या वतीने पुन्हा सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, सध्याचे सर्व्हेक्षण हे थर्मलस्कॅनल मिटर व पल्सऑक्सीमिटरद्वारे करण्यात येत आहे, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.
कराड शहरात मंगळवार पेठ, रूक्मिणीनगर आदी भागातील नागरिकांची याद्वारे तपासणी करण्यात आली. इतर भागातील नागरिकांचीही तपासणी केली जाणार आहे. शहरातील अनेक नागरिक नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने पुणे-मुंबईसह इतर गावांमध्ये स्थायीक झाले आहेत. मात्र, करोना महामारीमुळे त्यांना परत आपल्या गावी जाण्याची मुभा शासनाने दिली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसात अनेकजण आपल्या घरी परतु लागले आहेत. त्यामध्ये कराड शहरातील नागरिकांचाही समावेश आहे. सर्वांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर पालिकेचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. मात्र, त्यांच्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, यासाठी पालिकेने पुन्हा सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्याचे सर्व्हेक्षण हे थर्मलस्कॅनल मिटर व पल्सऑक्सीमिटरद्वारे करण्यात येत आहे. सर्व्हेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची तपासणी करत आहे. या ऑक्सीमीटरमुळे सर्व्हेक्षण सुलभ होण्यास मदत होत आहे.