पिंपरी -राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रकार समोर येत आहे. वल्लभनगर आगाराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या 27 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू होते. आता अचानक त्यांना आंदोलनाची जागा बदलण्यास पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांना शनिवारी (दि. 4) आंदोलनाची जागा बदलत रस्त्याच्या पलिकडे आंदोलनासाठी बसावे लागले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात “मेस्मा’ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. त्याशिवाय, राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली जात आहे. वल्लभनगर आगारातील 23 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. वल्लभनगर आगाराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या 27 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आगाराच्या प्रवेशद्वाराला लागूनच असल्याने त्याला एसटी महामंडळ व्यवस्थापनाने आक्षेप घेतला होता.
त्यामुळे पोलिसांनी कर्मचाऱ्यांना आगारापासून 200 मीटर अंतराबाहेर आंदोलन करण्याची सूचना केली. त्यानुसार कर्मचाऱ्यांना आंदोलनाची जागा बदलावी लागली आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर जवळपास 27 दिवसाने प्रशासनाला उपरती सुचली आहे. एवढे दिवस कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. तेव्हा ही बाब लक्षात आली नाही. आता अचानकच आंदोलनाची जागा बदलण्याबाबत सांगितल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.