मराठी साहित्यातील आधुनिक वाल्मिकी अशी ओळख असलेले ग. दि. माडगूळकर यांचा आज स्मृतिदिन (14 डिसेंबर 1977). गदिमांच्या कवितेतील शब्द सौंदर्य जणू पहाटेचे गोड स्वप्नच. या लेखाच्या शब्दांजलीतून गदिमांना अभिवादन.
वाल्मिकींचा शब्द अलौकिक,
आदिकथा संस्कृत
स्वरूप त्याला पहा लाभले,
सुंदरसे प्राकृत
सहाण कागद,
उगाळिले झरणीचे चंदन
माणदेशच्या माती मधुनी,
प्रकटलु गजानन
रवींद्र भटांचे हे शब्द म्हणजे सरस्वती पुत्र गदिमांचे अगदी यथार्थ वर्णन आहे. ज्या गीतांची गोडी, लोकप्रियता आजही अजोड आहे अशी अजरामर गीतरचना करणाऱ्या गदिमांनी वाल्मिकींच्या शब्दांना प्राकृतात चपखल बसविले. नुसते गीतरामायणातील शब्द जरी वाचले तरी हाती एखादा टपोरा मोती यावा असे वाटते. अशा विविध भूमिका म्हणजे, कथाकार, गीतकार, संवाद लेखक, अभिनेते, निर्माते, वक्ते, कादंबरीकार, नाटककार, संपादक गदिमा म्हणजे साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले अलौकिक व्यक्तिमत्त्व.
त्यांच्या मराठमोळा व्यक्तिमत्त्वात संस्कृती, परंपरा यांना जपणारा साहित्यिक कलावंत वास करीत असतो. मराठी कवितेला त्यांनी नवी ओळख दिली. त्या कवितांची गीते झाली. अनेक पटकथा आणि दोन हजारांहून अधिक गाणी त्यांनी लिहिली. त्या गीतांना लय होती. त्यांचे शब्द सुंदर होते आणि म्हणूनच मराठी मनाला आजही ती खूप भावतात.
गोरी गोरी पान, एका तळ्यात होती, नाच रे मोरा, एक धागा सुखाचा, जग हे बंदिशाळा, घन घन माला नभी दाटल्या, इंद्रायणी काठी, विठ्ठला तू वेडा कुंभार अशी त्यांची काही गीते सहज गुणगुणली तरी विषयांची विविधता, शब्दसौंदर्य, त्यातील आशयघनता, संगीतकारांनी दिलेल्या चाली आणि गायकांचे कसब यामुळे ही सारी गीते अजरामर झाली. त्यांची गोडी नुसती अविटच नाही तर चिरंतन आहे. त्यातील भावार्थ, संवेदनशीलता आणि माधुर्य मनाचा वेध घेणारे आहे.
या सरस्वती पुत्राची “नदी मिळता सागरा…’ ही एक अशीच छोटी पण आशयघन कविता. आपण शाळेत जलचक्र शिकतो. सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग होतात, ते वरवर जातात, मग पाऊस पडतो वगैरे. पण या जलचक्राकडे कवी कोणत्या नजरेने पाहतात? गदिमा म्हणतात,
नदी मिळता सागरा,
पुन्हा येईना बाहेर
अशी शहाण्यांची म्हण,
नाही नदीला माहेर
काय सांगू र बाप्पानो,
तुम्ही आंधळ्याचे चेले
नदी माहेराशी जाते,
म्हणूनच जग चाले
सारे जीवन नदीचे,
घेतो पोटात सागर
तरी तिला आठवतो,
जन्म दिलेला डोंगर
डोंगराच्या मायेसाठी,
रूप वाफेचे घेऊन
नदी तरंगत जाते,
पंख वाऱ्याचे लेवून
पुन्हा होऊन लेकरू,
नदी वाजविते वाळा
पान्हा फुटतो डोंगरा
आणि येतो पावसाळा
कवींनी नदीला प्रतीकात्मक स्त्री संबोधले आहे. स्त्रिया सासरी सर्वस्व अर्पण करतात पण माहेराशी नाते संपत नाही. ओढ सरत नाही. नदी सागरात मिसळून जाते, तोही तिला सामावून घेतो. पण तिला जन्म दिलेला डोंगर आठवत राहतो. मग माहेरी जाण्यासाठी ती बालरूप घेऊन, म्हणजे वाफेचे रूप घेऊन, तरंगत जणू वाळा वाजवित, वाऱ्यासमवेत डोंगराकडे म्हणजे जन्मदात्याकडे जाते आणि तिचे हे बालरूप पाहून, पित्याला पान्हा फुटतो म्हणजेच पाऊस पडतो. जीवनचक्र चालू राहते.
नदीच्या रूपकात एका स्त्रीची माहेरची ओढ व्यक्त करताना गदिमांनी एका छोट्या कवितेत किती अर्थपूर्ण रचना केली आहे. कवितेतील शब्ददेखील अगदी सहज आणि सोपे आहेत. गीतरामायणासारखी अजरामर कलाकृती हातून घडल्यावर माझ्या हातून ही देवाची पावले उमटली आहेत… अशी विनम्र भावना व्यक्त करणारे गदिमा. “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा।’ असे सोप्या शब्दांत अध्यात्म सांगणारे गदिमा म्हणजे नुसते सरस्वती पुत्रच नाहीत, तर शब्दांवर अधिराज्य करणारा अनभिषिक्त सम्राट, शब्द प्रभू आहेत.
एके दिनी परंतु,
पिल्लास त्या कळाले
भय वेड पार सारे,
वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना,
चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्याला कळाले,
तो राजहंस एक
असा हा महाराष्ट्राचा एक राजहंस… गदिमा.
आरती मोने