– प्रा. डॉ. सुभाष राठोड
आज 15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती आहे. थोर समाजसुधारक संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना उजाळा देणारा हा लेख प्रपंच…
संत सेवालाल महाराज यांचा जन्म गोरबंजारा समाजात माघ कृष्ण पक्ष शके 1661 मध्ये अर्थात 15 फेब्रुवारी, 1739 रोजी तेलंगणा राज्यातील गुलालदोडी, ता. गुत्ती जि. अनंतपूर येथे झाला. आता ते गाव ‘सेवागड’ या नावाने ओळखले जाते. काही जाणकारांच्या मते संत सेवालाल महाराज यांचा जन्म कर्नाटक राज्यातील ‘स्वर्णकोप्पा’ येथे झाला असावा. महाराजांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक तर आईचे नाव धर्मणी होते. भीमा नाईक हे तांड्याचे नाईक होते. सेवादास, सेवाभाया, मोतीवाळो, तोडावाळो अशीही संत सेवालाल महाराज यांची विविध नावे गोरबंजारा समाजात प्रचलित आहेत. महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात ‘पोहरागड’ येथे त्यांची समाधी आहे.
संत सेवालाल महाराजांचे कार्य समस्त मानवजातीला प्रेरित करेल असे आहे. त्यांच्या परिवर्तनवादी, विज्ञानवादी, पुरोगामी, क्रांतिकारी, मानवतावादी, तत्त्ववादी, सत्यवादी, विचारांची आज समाजाला नितांत गरज असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
मानवतावादी विचार
श्री संत सेवालाल महाराजांचे विचार हे मानवतावादाची शिकवण देणारे आहेत. समाजातील भोळ्या समजुती, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, अनीतीचे व्यवहार, भूतदया, निसर्गप्रेम, स्वकर्तृत्वावर विश्वास, सत्य-अहिंसा इत्यादींविषयी महान विचार, वचने, दोहे व भजने या रूपात प्रकट झालेले आहेत. प्राणिमात्रांवर दया करा, निसर्गाचे संगोपन करा, कोणत्याही विचारांचा, गोष्टींचा बुद्धिप्रामाण्यवादी कसोटीवर तपासून मगच डोळसपणे त्यांचा स्वीकार करा. अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नका, परंतु, स्वतः इतरांचे विश्वासपात्र बना, प्रगत विचारांचा, मिळून मिसळून गुण्यागोविंदाने राहणारा समाजच प्रगतीपथावर जाऊ शकतो. कुणाची निंदानालस्ती करू नका. सत्याचा मार्ग स्वीकारा. नेहमी सत्याच्या बाजूने राहा. गोरगरिबावर अन्याय करू नका. चोरी-हिंसा करू नका. भावा-भावांमध्ये वैर नको.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. बुवाबाजी अंधश्रद्धेच्या मागे लागू नका. थोर संत सेवालाल महाराज यांनी तीनशे वर्षांपूर्वी पाण्याचा अपव्यय न करण्याचा तसेच पाणी जपून वापरण्याचा दिलेला विचार आजच्या युगात विशेष प्रासंगिक आहे. संत सेवालाल महाराज यांनी बंजारा समाजाला उत्तम जीवन जगण्याचा मार्ग दाखवला व समाज उद्धाराचे काम केले. ‘एक दिवस मोल देऊन पाणी विकत घ्यावे लागेल’ असा इशारा त्यांनी दिला होता, संत सेवालाल महाराजांचे बंजारा बोलीतील एक प्रसिद्ध बोलवचन म्हणजे ‘जाणजो छाणजो, पंचज माणजो.’ म्हणजे कोणत्याही बाबींकडे डोळसपणे विज्ञानवादी निरीक्षणातून पाहा. त्या गोष्टीचा अर्थ, तात्पर्य ओळखा, योग्य-अयोग्याचा सारासार विचार करूनच कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करा. केवळ कोणीतरी सांगितले आहे म्हणून ते स्वीकारू नका. समाजासाठी आजन्म ब्रह्मचारी राहून बंजारा समाजाला अंधश्रद्धेतून, बुरसटलेल्या विचारातून पुढे आणणारे, काळाच्या बाबतीत दूरदृष्टी असणारे संत सेवालाल महाराज बुद्धिप्रामाण्यवादी संत होते.
स्वावलंबी बना
माणसाने आपल्या जीवनात स्वावलंबी बनले पाहिजे. ‘जो दुसर्यावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला’ या उक्तीप्रमाणे व्यक्तीने दुसर्यावर विसंबून न राहता स्वावलंबी बनावे, याविषयी संत सेवालाल महाराज म्हणतात-
केरी भरोसेप मत बेसो,
पण दुसरेर भरोसेर बंनो ।
कोई केरी वाट चालेनी ।
सौतार वाट सौताच चालो ।
भावार्थ : तुम्ही दुसर्याच्या भरोशावर विसंबून राहू नका; परंतु दुसर्याच्या भरवशाचे बना. कोणी कोणाची वाट चालत नाही म्हणजे सर्वकाही स्वतःलाच करावे लागते. इतरांची वाट चालण्यापेक्षा स्वतःची नवीन वाट तयार करा.
चोरी, दुर्व्यवहार करू नका
समाजात मेहनती, नीतिमान व चारित्र्यसंपन्न लोकांची गरज असते. चोरी करून पोट भरणार्या, दुर्व्यवहार, फसवणूक करणार्या ठगांविषयी संत सेवालाल महाराज सांगतात-
करिये चोरी, खाये कोरी ।
घरे मुढांग एकच मोरी ।
हाते मांही आये हातकडी ।
पग लागीये बेडी ।
हिंडिय रे डोरी डोरी।
भावार्थ ः चोर, लुटारू माणसे समाजात असतील तर अशांतता पसरते, अराजकता माजते, लोकांना दुःख भोगावे लागते. पण चोरी करणारे पकडले गेले तर त्यांच्या हातात हातकड्या, पायात बेड्या पडतात. पोलीस त्याला पकडून गल्लीबोळातून फिरवत नेतात. त्यांच्या मुलाबाळांचे हाल होतात. तेव्हा चोरी करण्यापेक्षा कष्टाची चटणी-भाकरी आवडीने खावी. चोरी केल्याने कोणीही सुखी होत नाही.
स्त्रियांना छळू नका
पूर्वीच्या काळी समाजात स्त्रियांचा फार छळ होत असे. मूलबाळ होत नसेल तर त्या स्त्रीचा समाजात खूप छळ होत असे. म्हणून तिला हीन दर्जाची वागणूक दिली जात असे. तिचे तोंड पाहणेही अशुभ मानले जात असे. संत सेवालाल म्हणत असत की, वळाई हुई छोरी रो मामलो मत तोडजो। म्हणजे विवाहित मुलीची फारकत (घटस्फोट) करू नका. तिला सन्मानाची वागणूक द्या.
निसर्गावर प्रेम करा
सेवालाल महाराज जिथे जिथे जात तेथे वड, पिंपळ, चिंच व कडुनिंबाचे झाड लावत. त्याचे कारण सांगताना म्हणत, वडाच्या झाडाची सावली दाट असते. पिंपळाच्या झाडाजवळ पाणी असते.कडुलिंबाचे झाडांमुळे हवेचे शुद्धीकरण होते. औषधी उपयोग होतो. इतकेच नव्हे तर मृत्यूनंतर आपली समाधीसुद्धा चिंचेच्या झाडाखाली बांधावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती
अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला
अंधश्रद्धेतून लोकांना बाहेर काढण्यासाठी आयुष्यभर सेवालाल महाराज कार्य करत राहिले. समाजाला योग्य दिशा देऊन योग्य मार्गावर आणण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी समाजाला सन्मार्गाची जाणीव करून दिली. त्यांनी समाजाला बुद्धिप्रामाण्यवादाचे आणि विज्ञानाचे धडे दिले. त्यांची वचने, दोहे साध्या सोप्या व सरळ अशा बंजारा बोलीभाषेत आहेत. त्यांचे क्रांतिकारी अमृततुल्य विचार केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित न राहता संपूर्ण समाजाला स्वावलंबी होण्याची ऊर्जा देणारे आहेत. समानतेची, स्वावलंबी होण्याची, कष्ट करण्याची, लबाडी न करण्याची आणि कुटनीतीचे व्यवहार न करण्याचे, चोरी व नशापाणी न करणे, कर्मकांडात वेळ, पैसा व शक्ती वाया न घालवता, देवी-देवतांना जीवांची बळी न देता प्रत्येक विचार, कृती, घटनेमागील सत्यता तपासून डोळस बनण्याचे, वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.