माधुरी तळवलकर
छत्रपती शिवाजी महाराजांची आज 21 मार्च रोजी तिथीने जयंती. त्यानिमित्त… छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रातच काय, देशभरातही असणार नाही. त्यांचे चारित्र्य, त्यांचा पराक्रम याचे गारूड आपल्या मनावर कायमच पडलेले आहे. मोगल सत्तेला आव्हान देऊन स्वराज्य स्थापन करणारा आपला हा लाडका राजा! कधीकधी असे होते की, एखाद्याला फार आपले मानले की, त्याच्या काही विशिष्ट गुणांवरच आपण प्रेम करतो. त्याचे पूर्ण व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याकडे आपले दुर्लक्ष होते.
उदाहरणार्थ, आईने आपल्याला जन्माला घातले, प्रेमाने वाढवले, आपली काळजी घेतली याविषयी आपल्या मनात तिच्याबद्दल नितांत आदर असतो. पण तिची बुद्धिमत्ता, तिचे बाहेरच्या जगातील कर्तृत्व, तिची ज्ञानलालसा, धाडस या गुणांकडे आपले दुर्लक्ष होत असेल. मला वाटतं, महाराजांच्या बाबतीत आपले असेच होत असेल का? परकीयांच्या जोखडातून आपण कधी मुक्त होऊ शकू, आपले
स्वतःचे राज्य कधी असू शकेल ही कल्पनाच त्या काळात अद्भुत, पूर्णपणे नवीन होती. त्या वेळी महाराजांनी अतुलनीय शौर्य दाखवून, आपल्या पराक्रमाने इथल्या रयतेचे राज्य स्थापन केले. त्यामुळे त्या अद्भुतरम्य आनंदातच आपण रममाण झालो आहोत. पण खरे तर, त्यांचे केवळ इतकेच कर्तृत्व नाही. शिवाजी महाराज नुसते राज्य स्थापन करून थांबले नाहीत, तर त्यांनी त्याचे सुराज्य केले. जिंकलेल्या नवीन मुलखाची उत्तम व्यवस्था लावण्यासाठी मुलुख जिंकण्याआधीच ते आपले अधिकारी बरोबर घेऊन जात. परवान्यावाचून महाराजांच्या मुलखातून कोणालाही प्रवास करता येत नव्हता. “योग्य ते काम न झाल्यास शासन करण्यात येईल’ अशी याबद्दल सक्त ताकीद मद्रासच्या फ्रेंच गव्हर्नरला त्यांनी दिली होती. जिंजीच्या किल्ल्यावर ते राहिले नाहीत; पण त्या भागाचे महत्त्व त्यांनी जाणून हा किल्ला महाराजांनी चांगला बळकट करून ठेवला.
महाराजांचा अंतिम सामना हा मुघल बादशहाशीच होणार होता. संख्येने प्रचंड व शस्त्रास्त्रांनी समृद्ध अशा मुघल सत्तेचा पराभव समोरासमोरच्या लढाईत करणे आपल्याला अशक्य आहे, असे समजूनच आजवर मोगलांना कधी विरोध झाला नव्हता. पण शिवाजी महाराजांनी यावरही मोठ्या हिकमतीने उपाय काढला. मोगलांना लक्ष द्यावे लागेल अशा प्रदेशाची त्यांनी लांबी वाढवली. त्यामुळे लांबच लांब प्रदेशावर वचक बसवण्यासाठी मोगलांना जास्त सैन्य ठेवावे लागले. आग्रा ते जिंजी एवढ्या प्रचंड मुलखात मुघलांसाठी युद्धक्षेत्र निर्माण झाल्यामुळे त्यांची महत्त्वाची आर्थिक व्यवस्था खिळखिळी झाली आणि पिढ्यान् पिढ्यांचा खजिना मातीमोल झाला. महाराजांची ही मुत्सद्देगिरी व दूरदृष्टी खरोखर अद्वितीय म्हटली पाहिजे.
महाराजांनी जे दुर्गम व भक्कम किल्ले बांधले ते अतिशय विचारपूर्वक उभारले. वेळच्यावेळी डागडुजी केली जात असे. तटबंदीची पडझड झाली असल्यास पुन्हा बांधून काढली जात असे. “गडावरी आधी उदक पाहून किल्ला बांधावा’ असा त्यांचा आदेश होता. लढायांच्या वेळी तोफांच्या दणक्यांमुळे जिवंत झरे आटण्याचा धोका असतो. त्यासाठी पर्यायी योजना म्हणून साठवणुकीचे पाणी खडकात कोरलेल्या टाक्यांच्या स्वरूपात असायला हवं असा त्यांचा आग्रह होता. आजही अशी तळी आणि टाकी किल्ल्यांवर आढळतात.
आपल्या अधिकाऱ्यांना महाराज नेहमीच सांगत, “रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. नाहीतर रयतेचा तळतळाट होईल आणि ती म्हणेल की, हे कसले स्वराज्य? यापेक्षा मोगल बरे!’ मोगलांनी त्या वेळी जिंकलेल्या प्रदेशातील हिंदू स्त्रीपुरुषांवर अत्याचार केले. लुटालूट, मूर्तीभंजन केले. महाराजांनी मात्र शत्रूला हरवून जिंकलेल्या प्रदेशातील स्त्रीपुरुषांना जराही धक्का लावला नाही. ते युद्ध फक्त रणांगणावर लढले. त्यामुळेच शिवाजी महाराज इतर सत्ताधीशांपेक्षा वेगळे ठरतात. पुरेसे पाठबळ नसताना, प्रशिक्षित सैन्य हाताशी नसताना, आधुनिक शस्त्रसामग्री उपलब्ध नसताना बलाढ्य अशा साम्राज्याशी त्यांनी लढा दिला तरी कसा, हा जगभरातल्या लोकांसाठी कुतुहलाचा विषय आहे.
शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली, त्या वेळीही प्रजेने प्रतिकार केला नाही तर त्यांना कुणालाही मारायचे नाही अशा महाराजांच्या धोरणामुळे तिथे काहीही मनुष्यहानी झाली नाही. या लुटीतून मिळालेल्या पैशांचा उपयोग त्यांनी आपले आरमार उभे करण्यासाठी केला. एका इंग्रज वार्ताहराने म्हटले आहे, “शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा दरारा एवढा आहे की, महाराज येत आहेत एवढे नुसते कळाल्याबरोबर मुघल किल्ले सोडून जातात.’ राज्यासाठी जो खर्च करायचा असेल त्या बाबतीत महाराज अत्यंत काटेकोर होते. जमीन-महसुलातून मिळणारे सर्व उत्पन्न खर्च करू नये, काही शिल्लक टाकावे असा त्यांचा नियम होता. त्याला ते खजिना म्हणत. अगदी नाइलाजच झाला तरच या खजिन्याला हात लावण्याची परवानगी असे. तीही महाराजांची खास मंजुरी घेऊन.
हे मावळे राजांसाठी प्राण द्यायला तयार असले तरी महाराज व्यवहारात चोख होते. आपल्या रयतेच्या कुटुंबांची जबाबदारी आपल्यावरच आहे असे ते मानत असत. त्यांच्या राज्यात आर्थिक गैरव्यवहाराला थारा नव्हता. शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्याची स्थापना केली असे नाही; तर तिथे उत्तम प्रशासन ठेवले, नीतीने राज्य केले आणि म्हणूनच त्यांच्या पश्चातही मराठ्यांनी आपले राज्य राखले. शिवाजी महाराज हे कालातीत राज्यकर्ते आहेत आणि म्हणूनच आजही त्यांच्या राज्यकारभाराचा अभ्यास देशोदेशी होतो आहे.