पुणे – आंबट गोड द्राक्ष म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा द्राक्षांची मार्केट यार्डातील फळ विभागात आवक वाढली आहे. पुणे जिल्हा, सोलापूर, फलटण भागांतून द्राक्षांची आवक होत आहे. हा हंगाम मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
डिसेंबरमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. त्यानुसार आता आवक वाढली आहे. साधारणपणे चार ते साडेचार टन द्राक्षांची आवक होत आहे. नोव्हेंबरमध्ये हंगामपूर्व द्राक्षांची आवक झाली होती. त्याला चांगले दर मिळाले होते. आता नियमित आवक सुरू झाल्याने द्राक्षांच्या भावात घट होईल, अशी माहिती छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील द्राक्ष व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.
घाऊक बाजारात एक किलो द्राक्षाला प्रतवारीनुसार ५० ते ५५ रुपये भाव मिळाला. चांगल्या प्रतीच्या सुपर सोनाका जातीच्या द्राक्षांना ८० ते १२० रुपये किलो असे भाव मिळत आहे. दरवर्षी फळबाजारात द्राक्षांची सर्वाधिक आवक सांगली जिल्ह्यातील तासगाव परिसरातून होते. मार्चमध्ये सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षांची आवक वाढते. नाशिक परिसरातील द्राक्षे प्रामुख्याने मुंबईतील बाजारात विक्रीस पाठविली जातात, असे मोरे यांनी सांगितले.
द्राक्षांचे दहा किलोचे दर
- सुपर सोनाका- ६०० ते ११०० रुपये
- तास ए गणेश- ५०० ते ७०० रुपये
- जंबो सुपर सोनाका- ८०० ते १२०० रुपये.