मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक पार पडत असून अध्यक्षपदासाठी शरद पवार-आशीष शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे आणि मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. याच निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर दिसून आले. यावेळी शरद पवारांनी केलेल्या टोलेबाजीला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
या कार्यक्रमातील भाषणांदरम्यान तिन्ही नेत्यांनी तुफान टोलेबाजी करत उपस्थितांची दाद मिळवली. मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट कोणाचाही उल्लेख न करता आपल्या भाषणामधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा दिला. ‘मी आणि फडणवीस एकत्र आहोत. आम्हाला थोडी थोडी बॅटींग येते’ असे शिंदेंनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, ‘आम्ही तीन महिन्यांपूर्वी थोडीशी बॅटींग केली’ असे म्हणत सत्तासंघर्षाचा संदर्भ दिला. यावर बाजूलाच बसलेल्या शरद पवारांनी संधी मिळाली तर कॅचही घेतात अशा आशयाचे विधान केले अन् शिंदेंनाही हसू आले. शिंदेंनी लगेच आम्ही सर्वांच्या आशीर्वादाने ही मॅच जिंकली असे म्हणत टाळ्या मिळवल्या.
“पवारसाहेबांचा जन्म साताऱ्याचा आहे. माझाही जन्म साताऱ्याचा आहे. त्यामुळे पवारसाहेबांनी सांगितलं ते आम्हाला करावच लागेल,” असे मुख्यमंत्री शिंदे भाषणामध्ये म्हणाले. त्यानंतर आपल्या डावीकडे बसलेल्या फडणवीसांकडे पाहत, “इकडून आता नागपूर कनेक्शन पण आलेलं आहे,” असे हसत म्हटले. पवार यांनी यापूर्वीच्या निवडणुकीच्या अनुभवावरुन आपलं पॅनेल जिंकेल असा विश्वास व्यक्त केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये नमूद केले.
तसेच, ‘मी, फडणवीस, पवार एकत्र असल्यानं काही जणांची झोप उडू शकते’ असं विधान शिंदेंनी आपल्या भाषणात केलं. “पवारसाहेब आपण जे म्हणालात त्याने मला आनंद झालेला आहे. माझ्या बाजूला देवेंद्रजी आहेत त्यांनाही आनंद झाला आहे. तिकडे आशिष (शेलार) आहे त्यालाही आनंद झाला आहे. पण काही लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे काही लोकांची झोप उडू शकते ना पवारसाहेबांच्या वक्तव्यामुळे,” असे विधान मुख्यमंत्री शिंदेंनी केले.