आज कोल्हापूरहून सुमाआत्या घरी येणार होती. बाबा तिला घरी आणण्यासाठीच स्टेशनवर गेले होते. आता पाहुणे घरी येणार म्हटल्यावर आजच्या स्वयंपाकाचा बेतही तसा खासच होता, आमरस पुरीचा. सोबत खुरड्या, पापड्या, भजी… सगळं कसं साग्रसंगीत होतं.
बाळू, शमीसाठी तर आमरस पुरीचा बेत म्हणजे एकदम खासमखास. आईच्या हातचा आमरस तर त्यांच्या अतिशय आवडीचा. शमीला काय हुक्की आली कुणास ठाऊक. तिने आईसमोर चक्क आंब्यावर तयार केलेलं एक नव गाणं मोठ्ठ्यानंच ठेक्यात गायलं…
“कच्च्याची लागते, आंबट फोड
पिकल्यावर होतो, हा मधुर गोड
रस याचा पिऊन, एकदा तरी पाहा
फळांचा राजा, अहो, आंबाच हा…’
बाळूने तर घरातलं स्टिलचं ताट घेऊन त्याचीच डफली केली. शमीच्या मागे तो कोरस दिल्यासारखा मोठ्ठ्यानं गळा काढून, फळाचा राजा, आंबाच हा… असं दोनदा तिनदा म्हणायचा. त्यांच्या गाण्यांनी घर अक्षरशः दूमदूमून गेलं. आईचं तर डोकंच उठलं, पण सांगणार कुणाला? त्यांचं गाणं बजावणं यथावकाश संपल्यावर बाळू, शमीने आता आईकडे एकच हेका पकडला.
ये आई आम्ही करू का तुला स्वयपांकात मदत. आंबे देऊ का पिळून? शेवटी आई वैतागूनच म्हणाली. तुम्ही जाता का इथून पळून! नाहीतर हे घ्या तुम्हीच दोघं करा स्वयंपाक. आईचं कोड्यात बोलणं मुलांना कळून चुकलं. ती दोघं पुतळ्यासारखी आता स्तब्ध झाली. पोरांचा चेहरा वाचून आई मग मोकळी हसली. म्हणाली. थोडी कळ काढा. अरे, तुमची आत्या येईलच एवढ्यात. मग सगळेच आपण एकत्र जेऊ.
शेजारच्या माधवकाकांनी दरवर्षीसारखीच याहीवर्षी नैसर्गिकरित्या पिकवलेल्या हापूस आंब्याची पेटी कालच घरी आणून दिली. तेव्हापासून घरभर आंब्यांच्या वासाचा घमघमाट पसरला होता.
थोड्याच वेळात बाबा सुमाआत्याला घेऊन घरी आले. ते आल्यावर बाळू, शमीने त्यांच्या हातातल्या आधी बॅगा घेतल्या. मग हात पाय तोंड धुण्यासाठी पिंपातून बादलीभर पाणी काढून दिले. तोंड पुसायला पटकन टॉवेल आणून दिला. बाबा म्हणाले, स्वयंपाक झाला असेल तर आधी सर्व जेऊ मग मुलांनो, तुमच्या सुमाआत्याशी आपण भरपूर गप्पा मारू. सर्वांची जेवणं झाली. मग भरपूर गप्पा.
सुमाआत्याने गावच्या, तिच्या सासरच्या, तिच्या घरादाराच्या, शेताशिवाराच्या, पिकपाण्याच्या, गाईवासराच्या केवढ्या तरी हकीगती सांगितल्या. तिचं सांगणं भारी रसाळ. त्यामुळे सायंकाळचे पाच केव्हा वाजले ते कळलेच नाही. बाळू, शमी तर सुमाआत्याच्या गप्पांमध्ये हरवूनच गेले होते.
संध्याकाळी बाबांनी माधवकाकांना घरी चहाला बोलावायचे ठरवले. बाळू लगेच बाबांचा निरोप शेजारीच राहणाऱ्या माधवकाकांना देऊन आलासुद्धा. सदा हसतमुख, प्रसन्न चेहऱ्याचे माधवकाका घरी आले. चहा, कुरमु-याचा चिवडा, बिस्किटं आली.आता हळूहळू चहासोबत माधवकाकांशी गप्पा सुरू झाल्या. बाबा म्हणाले, तुम्ही पाठवलेले आंबे खूपच रसदार आणि चवीलाही खूप गोड होते बरं. माधवकाका म्हणाले, अहो, हा सगळा महिमा ते आंबे नैसर्गिकरित्या पिकवल्यामुळे बरं. बाळू मध्येच म्हणाला, काका, आंबे नैसर्गिकरित्या पिकवले म्हणजे नेमके कसे हो?
“अरे बाळू, त्याचं काय आहे, आंब्याचा सीझनमध्ये मोठ्या प्रमाणावर आंब्यांची विक्री होते. लोक रंगावर आणि सुगंधावर भुलून कृत्रिमपणे पिकवलेले आंबे विकत घेतात. झाडावरील आंबे काढल्यानंतर ते थेट बाजारात न आणता साठवले जातात. यावेळी काही जण अधिक नफ्यासाठी आंबा कृत्रिमरित्या लवकर पिकवून बाजारात आणण्यासाठी कॅलशियम कार्बाईड पावडरचा उपयोग करतात. मात्र हे घातक असून, त्यावर आता बंदी घालण्यात आलेली आहे. “नैसर्गिक’ वातावरणात आंबा पिकवण्यासाठी “रायपनिंग चेंबर’ हे तंत्र आमच्या गावी आता विकसित केले.’
बाळूचं कुतूहल वाढलं. “काका, “रायपनिंग चेंबर’ हे नमकं काय आहे हो?’
“अरे, साधरण 16 ते 20 टन क्षमतेचं चेंबर उभारलं जातं. आढीमध्ये आंबा पिकविण्याच्या पद्धतीत नैसर्गिक उष्णता निर्माण करून येथे आंबा पिकवला जातो. यासाठी सरासरी 10 ते 12 अंश तापमान राखले जाते. सात दिवसात आंबे पिकतात.हे “रायपनिंग चेंबर’ उभारण्यासाठी सरकारकडून अर्थसहाय्यही मिळतं. विविध प्रकारची घातक रसायने वापरून झटपट फळे पिकवणे सध्या सर्रास सुरू आहे. पण यामुळे फळांबरोबरच ही घातक रसायनेही आपल्या पोटात जाऊन आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात.’
“काका, नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा कसा ओळखावा बरं?’ बाळूचा पुन्हा प्रश्न तयार.
“बाळू, कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यावर हिरवे डाग असतात. हे आंबे बाहेरून पिकलेले दिसत असले तरी आतून ते कच्चेच असतात. तसेच कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे हे नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांपेक्षा अधिक पिवळट रंगांचे दिसतात.पण या आंब्यांचा गर मात्र हलक्या पिवळट रंगाचा असतो. या आंब्यांध्ये रसही फार कमी असतो. पण नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा हा कापल्यानंतर त्यातील रस गळायला सुरूवात होते.आणि चवीला तर हा आंबा अत्यंत गोड असतो.’
सुमाआत्या पटकन म्हणाली, “छान माहिती दिलीत बरं काका. माझ्या सासरीसुद्धा 12 ते 15 आंब्यांची झाडं आहेत. खूप आंबे येतात दरवर्षी. आता आम्हीसुद्धा नैसर्गिकपणे आंबे पिकवण्यासाठी तुमच्यासारखंच “रायपनिंग चेंबर’ उभारू.’
एकनाथ आव्हाड