श्रीगोंदा – (शहर प्रतिनिधी) – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यानुसार श्रीगोंदा शहर गुरुवारी सायंकाळी बंद झाले. तहसीलदार महेंद्र माळी, पोलीस निरीक्षण दौलतराव जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन खामकर यांनी शहरात फिरत दुकानदारांना बंद करण्याच्या सूचना दिल्या. शहरवासीयांनी याला प्रतिसाद देत तात्काळ दुकाने बंद केली.
श्रीगोंदा नगरपरिषदेने काही हॉटेल धारकांना नोटीस दिल्या आहेत. यामध्ये श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील हॉटेल व सर्व परमिट रूम, बियर बार, वाईन शॉप, ताडी विक्री, देशी विक्री हे प्रतिबंधात्मक कायदा 1897 अनवये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे नमूद केले आहे. अत्यावश्यक असलेले पेट्रोल पंप, दवाखाने, मेडिकल, भाजी मंडई व किराणा दुकान मात्र सुरू राहणार आहे. शिवाय शहरातील अनेक दुकाने बंद ठेवून आपण सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेऊ असे आवाहन प्रशासनाने सर्वाना केले आहे. जर कोणी आदेशाचे उल्लंघन केले तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया तहसीलदार माळी व पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली.
भाजीमंडई तीन ठिकाणी भरणार
शासनाच्या सुचनेनुसार उद्यापासून शहरात नगरपरिषदेसमोर भरणारी भाजीमंडई आता तीन ठिकाणी विभागली गेली आहे. एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार बाह्यवळण रस्त्यालगत असणाऱ्या उद्यानाजवळ, जोधपूर मारुती चौकात व बाजार तळावरील गाळ्यांजवळ भाजी विक्रेते बसणार आहे. नगरपरिषदेजवळ भाजी मंडई भरणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.