रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील साखरीआगर गावात जेली चॉकलेट घशात अडकून 9 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ‘रिहांश तेरेकर’ असे मृत बाळाचे नाव आहे. रिहांशला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, त्यापूर्वीच त्याने आपला जीव गमावला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, याप्रकरणी गुहागर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चॉकलेट घशात अडकल्याने बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. नातेवाईकांनी बाळाला उपचारासाठी गावातील डॉक्टरकडे नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला घोणेसरे येथे नेण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, नातेवाईक घोणेसरे येथे दवाखान्यात बाळाला घेऊन जात असतानाच वाटेत बाळाचा मृत्यू झाला. श्वास घेता न आल्याने बाळाचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून, स्थानिक पोलीस देखील या प्रकरणाची सविस्तर तपासणी करत आहेत.
दरम्यान, पालकांनी आपल्या मुलांना कोणतं चॉकलेट देत आहोत, तसेच ते चॉकलेट खाण्यायोग्य ते बाळ आहे की नाही, या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं आहे. त्यामुळे पालकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे.