मुंबई – शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागणार? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता होती. आजच्या या निकालाकडे सगळ्या फक्त महाराष्ट्राचंच नाही तर देशांचं लक्ष लागलं होतं. अखेर हा निकाल समोर आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे 16 आमदार पात्र असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचंही स्पष्ट केलंय.
या निर्णयानंतर आता राहुल नार्वेकरांच्या निकालावर विरोधकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातूनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांचे मनापासून अभिनंदन केले असून आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, “मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच मा. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते. पण, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. आज विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच मा. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 10, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हटले आहे की, मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल! असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांवर निकाल दिला आहे त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महेश शिंदे, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, अनिल बाबर, तानाजी सावंत, लता सोनवणे, प्रकाश सार्वे, बालाजी किणीकर, संदिपान भुमरे, बालाजी कल्याणकर, रमेश बोनारे, चिमणराव पाटील, संजय रायमुलकर यांचा समावेश आहे.