मुंबई- मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. भाजपच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता सांभाळणाऱ्या शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा आहे.
त्याउलट, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या दृष्टीने तो निर्णय अतिशय धक्कादायक आहे. स्थापनेपासून शिवसेना म्हणजेच ठाकरे असे समीकरण होते. शिवसेना ठाकरेंचीच ही ओळख निवडणूक आयोगाच्या निर्णयाने पुसली जाणार आहे. यापुढे शिवसेना हा शिंदेंचा पक्ष म्हणून ओळखला जाईल. त्यामुळे शिवसेनेबाबत देण्यात आलेला निर्णय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील ठळक घडामोडींपैकी एक म्हणून कायम कोरला जाईल.
या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय भोसले यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की, “आजचा निकाल पाहून स्वतः स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंदजी दिघे हे देखील आम्हाला आनंदाने आशीर्वाद देत असतील. ज्या दिवशी आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं त्याच दिवशी आमचा खरा विजय होता. न्यायदेवतेने आज त्यावर शिक्कामोर्तब केला. प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण हे शेवटी त्यांच्या सेवकाकडे येत असते. त्यासाठी तसा विचार करणारा नेता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात रामराज्य समाजाला दिसत आहे. हे सरकार धर्माचे, लोकहिताचे कार्यकरणारे सरकार आहे. मला वाटतं की आज पर्यंत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या लाखो आरोग्य सेवांचा लाभ घेतलेल्या रुग्णांचे व समस्त सकल संतांचे हे आशीर्वादचे फल आम्हाला लाभले आहेत.