तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – शिवाजी या तीन जादुई अक्षरांनी संपूर्ण देश व्यापून राहिला आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने मावळची भूमी पावन झलेली आहे. महाराजांचा पराक्रम हेच आपले खरे संचित असल्याची भावना इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केली.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आयोजित शिवजयंती सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी चंद्रकांत शेटे, डॉ.संभाजी मलघे, डॉ.संजय आरोटे, जी.एस.शिंदे, डॉ.रुपेश पाटील, डॉ.प्रमोद बोराडे, गोरख काकडे आदी उपस्थित होत.
यावेळी बोलताना काकडे म्हणाले की, शिवरायांचे समग्र रयतेचे राज्य होते. स्त्री सन्मानाचा नवा आदर्श महाराजांनी उभा केला. सागरी आरमाराची निर्मिती केली. फायनान्स, मॅनेजमेंट, टीमवर्क या आज जगात अभ्यासल्या जाणाऱ्या ज्ञान शाखा महाराजांनी उत्तम राबविल्या होत्या.
शिवव्याख्याते डॉ. प्रवीण माने म्हणाले की, छत्रपती शिवराय म्हणजे आपल्या आयुष्याला झालेला परिसस्पर्श आहे. ध्येय उच्च, उदात्त आणि प्रमाणिक असेल तर असामान्य पराक्रम जगविता येतो ही मोठी शिकवण शिवचरित्रातून मिळते.
यावेळी पारंपरीक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, राणीसाहेब साईबाई यांच्या व्यक्तिरेखा साकारल्या. यावेळी पालखीतून छत्रपती शिवरायांची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.