राजगुरुनगर (रामचंद्र सोनवणे/प्रतिनिधी) : “शिवनेरी ते मातोश्री” मशाल रॅलीचे राजगुरुनगर येथे स्वागत करण्यात आले. निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना पक्षाची नावं दिली होती. यात ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले. ठाकरे गटाला “मशाल” हे चिन्ह दिले आहे.
या चिन्हाचे ठाकरे गटातील सर्वच शिवसैनिकांनी स्वागत केले. पुणे जिल्ह्यातील ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर क्रांतीची मशाल प्रज्वलित करून ती मातोश्रीवर आज (दि.११) रोजी निघाली. पुणे जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रांतीची मशाल जात असून तिचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
राजगुरुनगर येथे मशाल रॅलीचे तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. या रॅलीसोबत आलेले जिल्हा प्रमुख सुरेश भोर, माजी जिल्हा प्रमुख सुनील मेहेरे, जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांचे राजगुनगर येथे शिवसेना महिला जिल्हा संघटक विजयाताई शिंदे, तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, नारायणगाव चे माजी सरपंच बापू पाटील, राजगुरुनगर शहर अध्यक्षा अर्चना सांडभोर, सुदाम कराळे, दीपक कांबळ, संदीप गाडे, एल बी तनपुरे, मृगेश काळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख माउली खंडागळे यांनी, “मशाल चिन्हामुळे शिवसेनेचा पाया भरला आहे. आमचे दैवत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिस्थळावर अभिवादन करून ही क्रांतीची मशाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त करणार आहोत. या मशालीत छत्रपती शिवरायांच्या मातीचा गंध, सुवास आहे.”
“जन्मस्थळाचे पवित्र आणि आई शिवाईचा आशीर्वाद आहे. अखंड पणे महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्री उठाव ठाकरे साहेबांनी जे काम केले. मात्र त्यांच्यावर या गद्दारांनी ही वेळ आणली.त्यांना भुईसपाट करण्यासाठी आणि त्यां रावणाच्या लंकेचे दहन करण्यासाठी हि शिवज्योत ही मशाल काम करणार आहे. पुणे जिह्यातील समस्त शिवसैनिकांच्या वतीने हि शिवज्योत घेऊन जात आहोत. निश्चितपणे या मशालीच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रावर भागवराज आणि मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाहीत” असे सांगितले