पिंपरी -राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्त्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या कामगार नोंदणीसाठी कामगार सेतू नोंदणी केंद्र, नाक्यावरील कामगारांकरीता कामगार निवारा उभारणार आहे, असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे,कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार, पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त शैलेद्र पोळ, कोकण विभागाचे अपर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, औद्योगिक सुरक्षा व जन आरोग्य संचालनालय पुणे विभागाचे संचालक एम. आर. पाटील, बाष्पके विभाग पुणे विभागाचे संचालक डी. पी. अंतापुरकर, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते.
डॉ. खाडे म्हणाले, कामगारांना हक्काच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारण्यात येईल. कामगारांना आरोग्यविषयक सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी राज्यात 6 मल्टीस्पेशालटी रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी एक चाकण येथे उभारण्यात येणार आहे. कामगारांचा अपघात झाल्यावर त्यांचा कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी विमा कंपनीबाबत योजना तयार करण्यात येत आहे.
सुरक्षा मंडळातील कर्मचारी, अर्धवेळ काम करणाऱ्या कामगाराला एक हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी खाडे यांनी कामगार भूषण आणि गुणवंत कामगारांची घोषणा केली. लवकरच मुबंई येथे पुरस्कार सोहळा आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, अजित अभ्यंकर, बाबा कांबळे, केशव घोळवे यांचा सन्मान करण्यात आला.