रायगड – सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य आणू. यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे शरद पवार म्हणाले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे नवीन पक्षचिन्ह दिले आहे. यानंतर रायगडावर ‘तुतारी’ या चिन्हाचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार फौजिया खान, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार राजेश टोपे आणि अन्य नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. तुतारी चिन्हाच्या अनावरणानंतर शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शरद पवार म्हणाले, हा एक वैचारिक दर्जाचा संघर्ष आहे. सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढायला मदत करणारा हा वारसा आहे. शिवछत्रपतींचा कालखंड तसा होता. तो कालखंड आत्मविश्वासाचा होता. राज्य नव्हतं पण सामान्य माणसाचे स्वप्न होते. ज्यामधूनच हे राज्य उभे राहिले.
या देशामध्ये अनेक राजे झाले. संस्थानिक झाले. पण यामध्ये शिवाजी महाराजांची ओळख वेगळी होती. शिवरायांचे राज्य हे सामान्यांचे राज्य झाले. ते जनतेचे राज्य झाले. हिंदवी स्वराज्य उभं करण्याचं काम छत्रपतींनी केले. पुन्हा जनतेचे राज्य येण्यासाठी कष्ट करायला लागेल.
यासाठी निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलो आहोत. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन, या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया.