नवी दिल्ली : राज्यात सत्ताधारी आणि विरोधक संघर्ष सुरु असतानाच दिल्लीत मोठ्या भेटीगाठींना सुरुवात झाल्याचे पहायला मिळत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटी संदर्भात आता शरद पवार यांनी माहिती दिली आहे.
शरद पवार यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध झालेल्या कारवाईसंदर्भातील मुद्दा पंतप्रधान मोदी यांच्यासमोर मांडला. याविषयी खुद्द शरद पवार यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची गरज नव्हती, हे मोदींसमोर बोललो. मात्र इतर कारवायांसंदर्भात बोललो नसल्याचं ते म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यांवर मोदींशी बोलल्याचे शरद पवार यांनी नमूद केलं. यावेळी पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असं ठणकावून सांगितलं. तसेच पुढील निवडणुकीतही आम्ही निवडून येऊ असंही ते म्हणाले.