नवी दिल्ली: करोना विषाणू अर्थात कोविड-19 च्या महामारीच्या जागतिक संकटाच्या काळात मानवतेची सेवा करणारे बुद्धांचे खरे अनुयायी आहेत. असे म्हणत या संकटाच्या काळात 24 तास कार्यरत असणाऱ्या करोना वॉरियर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या पवित्र दिवशी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मोदी म्हणाले, बुद्ध केवळ नाव नाही तर एक विचार आहे. भगवान बुद्ध यांनी जगाला कायम दिशा दाखवली. त्यांनी सांगितलेले चार मार्ग दया, करुणा, समभाव, स्वीकार भारतभूमीसाठी प्रेरणादायी आहेत. त्याग, समर्पणाची भावना म्हणजे बुद्ध होय. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जनतेत येण्यास आवडले असते, पण आजच्या परिस्थितीत ते शक्य नाही आहे. जेव्हा निराशा पसरते, तेव्हा बुद्धांचा विचार प्रासंगिक ठरतो, असंही ते यावेळी म्हणाले.
संपूर्ण देशच काय सारे जगही करोनाशी लढा देत आहे. आपण सर्वांनी एकजूट होऊन लढा दिल्यास या संकटाला तोंड देणे सोपे होईल. आज या संकटात भारत नि:स्वार्थी भावनेने सर्वांना मदत करत आहे. मग तो देश असो वा परदेश, या काळात नफा तोटा पाहिला जात नाही. आज भारत संपूर्ण जगाच्या पाठीशी उभा आहे. संकटकाळात मदत करणे हा आपला धर्म आहे. त्यामुुळे या संकटात शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिला.
आज आपण कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सतत प्रयत्न करण्यासाठी एकत्र काम करत आहोत. भारत निस्वार्थी भावनेने देशात आणि संपूर्ण जगात संकटात सापडलेल्या लोकांच्यामागे भक्कमपणे उभा आहे. संकटाच्या काळात सहाय्य करण्याची गरज आहे. शक्य तितकी मदत करा. संकटकाळात जगातील अनेक देशांना भारताची आठवण झाली. आज आपले प्रत्येक भारतीयाचे जीवन वाचवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत, पण त्याचबरोबर जागतिक जबाबदारीचेही पालन करतोय. भारताची प्रगती जगाच्या प्रगतीला सहाय्यक ठरेल.
– नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान