लाहोर – वादग्रस्त विधाने करून सातत्याने टीकेचा धनी बनण्याचा छंद जोपासणारा पाकिस्तानचा माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारत व पाकिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवा, अशी मागणी केल्यानंतर टीकेचा धनी बनलेल्या शोएबने पुन्हा एकदा टीकाकारांना आयतेच कोलित दिले आहे. अर्थात भारताच्या माजी खेळाडूंनी शोएबच्या इच्छेला विरोध दर्शविला आहे.
सातत्याने वादग्रस्त विधाने केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळानेही त्याला नोटीस बजावली आहे. सोशल मीडियावर चॅट करताना शोएबने भारताचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच भारतीय संघातील विविध खेळाडूंबाबत आपली मते देखील व्यक्त केली आहेत. सध्याच्या भारतीय संघात जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि महंमद शमी हे अत्यंत चांगले गोलंदाज आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत भारताला अनेक अविश्वसनीय विजय मिळवून दिले आहेत. त्यांना मार्गदर्शन करायला आवडेल, असेही शोएबने व्यक्त केले आहे.
भारतीय संघ आजच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहे. संघात युवा गोलंदाज देखील आपली निवड सार्थ ठरवत आहेत. अशा वेळी त्यांना एक गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करण्याची इच्छा आहे.
भारताच्या बुमराह, शमी यांच्याकडे वेग आहे, अचूकता आहे, स्विंग आहे. एका वेगवान गोलंदाजाकडे ज्या गोष्टींची आवश्यकता असते ते सर्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच भारतीय संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून सेकंड इनिंग सुरू व्हावी असे मला वाटते, असेही शोएबने सांगितले.