वंदना बर्वे
नवी दिल्ली – शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनाच भाजपशी हातमिळवणी करून युतीचे सरकार स्थापन करायचे होते. परंतु, यश येत नसल्याचे बघून त्यांनीच खासदारांना युती करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुचविले होते, असा सनसनाटी गौप्यस्फोट सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सेनेच्या 12 खासदारांना सोबत घेवून पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे गटात सामील झालेले खासदार राहुल शेवाळे, भावना गवळी, कृपाल तुमाने, सदाशीव लोखंडे, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, हेमंत गोडसे, श्रीरंग बारणे, राजेंद्र गावित आणि डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी राहुल शेवाळे यांनी अनेक सनसनाटी खुलासे केले.
तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे आणि कर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे आपणच खरे वारसदार असल्याचा पुनरूच्चार केला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात नव्याने अस्तित्वात आलेले शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार हे स्व. बाळासाहेब ठाकरे आणि कर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांच्या आधारावर स्थापन झाले आहे. या सरकारला आधी राज्यातील 50 आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. आणि आता सामान्य माणसांकडूनही समर्थन केले जात आहे.
2019 मध्ये निवडणुकीपूर्वी भाजपसेनेची युती झाली होती. विधानसभा एकजुटीने लढविली आणि युतीचा विजय झाला होता. परंतु, राज्यात युतीऐवजी महाविकास आघाडीचे वेगळेच सरकार स्थापन झाले. मात्र, आता मराठी माणसांनी निवडून दिलेले युतीचे सरकार अस्तित्वात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी जे काही करण्याची गरज आहे ते सर्व करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांना गटनेते आणि भावना गवळी यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. या सर्व 12 खासदारांनी सकाळी लोकसभाध्यक्षांची भेट घेतली होती. खासदार विनायक राउत यांची गटनेतेपद आणि राजन विचारे यांची मुख्य प्रतोदपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर असून ती रद्द करावी आणि जुन्या पदाधिकायांनाच कायम ठेवावे, अशा स्वरूपाची लेखी मागणी बारा खासदारांनी केली होती.
मोठा गौप्यस्फोट : ‘त्या’ बदल्यात तेजस्वी यादव भाजपला पाठिंबा देण्यास तयार होते
महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातील सरकार भाजपसेनेचे सरकार असून पक्षाने मला मुख्यमंत्री बनविले आहे. लोकशाहीत बहुमत महत्वाचे असते. संख्या महत्वाची असते. महाराष्ट्रात आणि संसदेत आमच्याकडे संख्याबळ आहे, असा दावा शिंदे यांनी केला.
अशातच, एक संघटना म्हणून शिवसेना या पक्षाचा प्रमुख कोण? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. परंतु, एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाला थेट उत्तर देणे टाळले. हाच प्रश्न वारंवार विचारूनही शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव घेण्याचे टाळले.
“काश्मिरी पंडितांच्या खऱ्या यातना दाखवण्याची “त्यांच्यात” हिंमत नाही”