नवी दिल्ली – सध्या देशभर गाजत असलेल्या सचिन आणि पाकिस्तानी सीमा हैदर या दोघांच्या प्रेमप्रकरणात नवीन वळण आले आहे. उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) जोडप्याला मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी बोलवले. त्यानंतर, एटीएसने तब्बल सहा तास दोघांची चौकशी केली असून, सीमा हैदरने सांगितलेल्या कथेतच ती अडकत जात असल्याची माहिती आता समोर येत आहे.
पाकिस्तानहून चार मुलांसह भारतात आलेली सीमा हैदरवर संशय असल्याने उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने सचिन आणि सीमा या दोघांनाही सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते.
यावेळी सचिनच्या वडिलांचीही चौकशी करण्यात आली होती. आठ तासांच्या चौकशीनंतर रात्री उशिरा तिघांनाही सोडून देण्यात आले होते. मात्र मंगळवारी पुन्हा एटीएसने सचिन आणि सीमाला बोलावून त्यांची चौकशी सुरु केली आहे.
एटीएसच्या पथकाने सीमा हैदरची चौकशी करताना, तिचा भाऊ पाकिस्तान फौजेत आहे का?, तिच्या इतर नातेवाईंकांसह तिचा काकाही पाकिस्तानच्या सैन्यात आहे का?, सीमाकडे चार फोन का होते?
सीमाने पाकिस्तानी सीमकार्ड का तोडले? ती भारतात कशी दाखल झाली? कराची ते नोएडापर्यंत पोहचताना तिला कोणी मदत केली का? यासह असे असंख्य प्रश्न तिला यावेळी विचारल्याची माहिती आहे.
यामुळे येतोय संशय
स्वतःला अशिक्षित सांगणारी सीमा हैदर इंग्रजीमध्ये संगणक आणि मोबाइलमधील गेम उत्कृष्टरित्या हाताळते. तिला टेक्नॉलॉजीचेही अतिशय उत्तम ज्ञान आहे. तसेच ती एकदम शुद्ध हिंदीही बोलते व तब्बल तीन देशांच्या सीमा पार करीत ती भारतात पोहचली आहे. या सर्व गोष्टींमुळे सीमा हैदरवर तपास यंत्रणाना संशय आहे.