संयुक्त राष्ट्र – लाल समुद्रामध्ये हौथी बंडखोरांकडून व्यापारी मालवाहू जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांवर संयुक्तक राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने जोरदार टीका केली आहे.
गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर पासून व्यापारी आणि मालवाहू जहाजांवर किमान दोन डझन वेळा हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांचा तीव्र निषेध करणारा एक ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने आज मंजूर करण्यात आला.
हौथींनी असे हल्ले ताबडतोब थांबवावेत. हे हल्ले जागतिक पातळीवरील वाणिज्य विषयक व्यवहारांच्या आड येत असून जलमार्गाने वाहतूक करण्याच्या अधिकारांचीही पायमल्ली होते आहे. तसेच जागतिक शांतता आणि सुरक्षाही यामुळे धोक्यात आली आहे, असे सुरक्षा परिषदेने या ठरावामध्ये म्हटले आहे.
एकूण १५ सदस्यांच्या सुरक्षा परिषदेमध्ये या ठरावाच्या बाजूने ११ सदस्य देशांनी मतदान केले. तर विरोधात कोणीही मतदान केले नाही. मात्र अल्जेरिया, चीन, मोझंबिक आणि रशिया हे मतदानाच्यावेळी अनुपस्थित राहिले.
लाल समुद्रातील परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी काळजी घ्यावी आणि संयम बाळगावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच हा तणाव कमी होण्यासाठी सर्व संबंधितांनी मुत्सदेगिरी वाढवावा.
त्यासाठी संवादाला सातत्यपूर्ण पाठिंबा देण्यात यावा आणि सेयुक्त राष्ट्राच्या मध्यस्थांच्या माध्यमातून येमेनमधील शांती प्रक्रीया राबवण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
भारताकडून परिस्थितीवर बारीक लक्ष…
हौथी बंडखोरांनी व्यापारी जहाजांवरचे हल्ले वाढवल्यामुळे लाल समुद्रात निर्माण झालेल्या परिस्थितीवर बारकाने लक्ष ठेवले जात असल्याचे भारताने गेल्या आठवड्यात म्हटले होते. त्यापूर्वीच नौदलाने सागरी सुरक्षेसाठी उत्तर आणि मध्य अरबी समुद्रात आपली जहाजे आणि विमाने तैनात केली आहे.
सागरी वाहतूकीच्या अधिकारांना भारत महत्व देतो. बदलत्या परिस्थितीवर सर्व बाजूंनी लक्ष ठेवले जात आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी सांगितले.