पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भारतीय संस्कृतीप्रमाणे सणवार आनंदाने साजरे करणे आवश्यक आहे. परंतु, ते करताना पर्यावरण रक्षण करणेही गरजेचे आहे. त्यामुळेच खडकवासला जलाशय रक्षण अभियान या वर्षीही राबवण्यात येणार असल्याचे हिंदू जनजागृती समितीकडून सांगण्यात आले. या उपक्रमाचे हे २१ वे वर्ष आहे.
धुलीवंदन दि. २५ मार्च आणि रंगपंचमी ३० मार्च या दोन्ही दिवशी प्रबोधनात्मक फलक हातात धरून सकाळी नऊ पासून सायंकाळी सात वाजेपर्यंत खडकवासला धरणाभोवती मानवी साखळी करून जलाशयाचे रक्षण करण्यासाठी प्रबोधन करण्यात येणार आहे. हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, खडकवासला ग्रामस्थ अन्य समविचारी संघटना, स्थानिक प्रशासन, पाटबंधारे खाते आणि पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात येणार आहे.
धुलीवंदन आणि रंगपंचमी या दिवशी अंगाला रंग लावून खडकवासला जलाशयात अंघोळीसाठी येणे हा प्रकार पर्यावरणाला हानीकारक आहे. संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणारा जलस्त्रोत प्रदूषित होत आहे. याचे भान रंगपंचमी खेळणाऱ्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे असे समितीचे म्हणणे आहे.