निघोज – पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी उच्चशिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे हे स्वप्न प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था संचालित अळकुटी येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका प्रथम वर्षातील नवोदित विद्यार्थांच्या स्वागत समारंभात त्या बोलत होत्या. या वेळी माजी सभापती काशिनात्त दाते, कैलास तांबे, दिनेश बाबर, राहुल पाटील शिंदे, सरपंच दत्ता पवार, सदानंद हिरेमठ, प्रा. दिघे, सोनाली सालके, अश्विनी थोरात, शुभांगी साळुंखे, सचिन वराळ, भाऊसाहेब पाटील, डॉ. भास्कर शिरोळे आदी उपस्थित होते.
विखे म्हणाल्या की, नवनवीन तंत्रज्ञानची कास धरून संस्थेने ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवले आहे. महाविद्यालयातून पास झालेले असंख्य विद्यार्थी देश- परदेशात अत्यंत चांगली जबाबदारी पार पाडत आहेत. अशा विद्यार्थ्यांचे मेळावे हादेखील कुतूहलाचा विषय ठरला असून, संस्था केवळ उच्च शिक्षण देऊन थांबत नाही तर त्यांना नोकरी, व्यवसायासाठी सर्वतोपरी सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.